नवी दिल्ली
: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांचे पुत्र समीर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर जनार्दन द्विवेदी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. राममनोहर लोहिया यांनी कलम 370 ला सदैव विरोध दर्शविला होता, असे द्विवेदी यांनी म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम पाहूनच भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे समीरने म्हटले आहे. मुलाच्या भाजप प्रवेशासंबंधी माहिती नसल्याचे सांगत द्विवेदी यांनी हा निर्णय त्याचा असू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दिल्ली निवडणुकीपूर्वी काँग्रेसने अनेक समित्यांची स्थापना केली होती. निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीत माजी सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांना सदस्यत्व देण्यात आले आहे. तत्पूर्वी द्विवेदी यांना संघटन महासचिवपदावरून हटविण्यात आले होते.
डिसेंबरमध्ये दिल्लीच्या लाल किल्ला मैदानात आयोजित गीता प्रेरणा महोत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत द्विवेदी यांनी भाग घेतला होता.