ऑनलाईन टीम / पुणे :
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना, पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्याचा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सुखसागर नगर परिसरातील गल्ली नंबर 1 येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा यामध्ये समावेश आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेव्हा फॅनच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने चौघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिंदे दाम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा घोटून नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून संबधित मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.