ऑनलाईन टीम / मुंबई
मुंबई येथील साकीनाका परिसरात घडलेल्या हैवानी अत्याचाराने संपुर्ण देशातुन संतापाची लाट उसळली. याच बरोबर अमरावती जिल्ह्यातील अल्पवयीन गर्भवती युवतीने आत्महत्या केल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. यानंतर आता 2020 चा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा (NCRB) अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
या आकडीवारीनुसार भारतात 2020 मध्ये दररोज सरासरी 80 खून आणि 77 बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आकडेवारीवरुन देशातील महिलांच्या असुरक्षेवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे.
या अहवालानुसार 2020 मध्ये प्रतिदिन सरासरी 80 हत्या भारतात घडतात. एकूण 29,193 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या तुलनेत 2020 च्या आकडेवारीत 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2019 मध्ये दिवसाला सरासरी 79 हत्यांसह एकूण 28,915 जणांची हत्या झाली होती.
2020 मध्ये देशभरात सर्वाधिक 3 हजार 779 हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेश राज्यात नोंद झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर, 3,150 बिहार आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. राज्यात 2163 हत्या झाल्या आहेत. तर, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 1,948 खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच राजधानी दिल्लीत 2020 या वर्षभरात 472 खून झाले, असंही या आकडेवारीत म्हटलंय.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 5310 बलात्कार घटना घडल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश 2,769 मध्य प्रदेश 2,339 आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 2,061 प्रकरणं नोंदवली गेली. 2019 मध्ये एक लाख महिला लोकसंख्यमागे गुन्ह्यांचं प्रमाण 62.3 टक्के होतं, तर हेच प्रमाण 2020 मध्ये 56.5 टक्क्यांवर होतं.