कोरोनाच्या लढय़ातील धक्कादायक वार, दिवसभरांत 80 बाधित तर 5 जणांचे मृत्यू : जनतेच्या भितीत वाढ
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येऊ पहात असतानाच शेकडो ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवलेल्या लोकांचे धडाधड पॉझेटिव्ह अहवाल येऊ लागले आहेत. पुण्यापेक्षा मुंबईहून आलेल्या लोकांना जिल्हय़ात विविध ठिकाणी क्वारंटाईन केलेले आहे. त्यांचे व बाधित आलेल्या लोकांचे स्वॅब काढून तपासणीला पाठवण्याच्या कामाने आता युद्ध पातळीवर वेग घेतला असून त्यातील लोकांचे अहवाला पॉझेटिव्ह येऊ लागले आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त न झालेल्या अहवालाने बुधवारची सकाळ भितीच्या धक्याने सुरू झाली. या अहवालात 52 जणांचे अहवाल पाझेटिव्ह आलेत.
सातारा, पाटण व खंडाळाकडे संख्या वाढत आहे
सकाळच्या अहवालांत माण 5, खटाव 2, जावली 5 महाबळेश्वर 5 कराड 3 व फलटण 1 असे आकडे आले असले तरी सातारा, पाटण व खंडाळय़ातील आकडे ज्या गतीने वाढत आहेत, त्यावरून इथल्या साखळय़ा तोडण्यासाठी लोकांच्या अथक परिश्रमाची गरज आहे. सातारा तालुक्यात 9 (एकुण ), पाटण 10 (एकुण ), खंडाळा 9 (एकुण ), असे आकडे वाढत चालले आहेत.
साखळय़ा तोडण्यासाठी वनवासमाची पॅटर्न राबवा
कोरानासंदर्भात जगभरातून प्रत्येक एका तासांत शंभर अपडेट येत आहेत. मात्र उगाच डोकेफोड करण्यापेक्षा जिल्हय़ातीलच उदाहरणावरून नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असलेल्या गावांनी आपली दिनचर्या ठेवण्याची गरज आहे. कराड तालुक्यातील वनवासमाची हे छोटेसे गाव यासाठी खुप काही सांगुन जाणारे आहे. छोटय़ाशा गावात बाधितांची संख्या 39 च्या पुढे गेली होती मात्र हेच गाव आता संपुर्ण कोरोनामुक्त म्हणून मोठय़ा ताठ मानेने उभे रहात आहे.
यासाठी ग्रामसमिती असो किंवा शासनाने दिलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी असो या साऱयांकडे त्या-त्या गावांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
म्हासोलीचा धोका वाढत आहे
कराड तालुक्यातील वनवासमाचीसह मलकापुरही आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर असताना म्हासोलीचा धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष वेधले असले तरी आता हॉटस्पॉट होतील अशा गावांची संख्या ही वाढलेली आहे. अशा वेळी जिल्हास्तरावरील उपाययोजानांपेक्षा त्या त्या ग्रामसमितींनी अचूक उपाययोजनांकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.