ऑनलाईन टीम / मुंबई
खेड्या -पाड्यातुन उराशी स्वप्नाचं गाठोडे घेऊन आलेले अनेक परिक्षार्थी शहरात कसे – बसे स्थिर होतात. चार दोन तास मिळेल ते काम करुन जेमतेम पैसे मिळवतात, आणि उरलेला संपुर्ण वेळ फक्त अन् फक्त अभ्यास करत असतात.असे हे चक्र किमान पाच वर्षे सुरु असते. याचा उद्देश असतो की, आपलं आणि आपल्या कुटूंबावर असणारं गरीबीचं चक्र संपाव मग त्यासाठी आपल्याला त्रास सोसावा लागेना का, यासाठी प्रत्येक परिक्षार्थीला परीक्षेच्या चक्रातून जावंच लागतं. या परीक्षार्थींची संख्या महाराष्ट्रात लाखोंच्या घरात आहे. हीच मेख ओळखून काही समाजकंटकांनी परीक्षांत साखळी करुन गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
याच पार्श्वभुमीवर टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं समोर येतं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आज आणखी दोघांना अटक केली आहे. अश्विन कुमार आणि सुखदेव ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील अश्विन कुमार यांना बंग्ळूरूमधून ताब्यात घेतलं आहे. या आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत.ताब्यात घेतलेल्या आरोपींनी तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले असून, त्यासाठी तब्बल ५ कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
टीईटी, म्हाडा आणि सैन्य भरतीच्या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं समोर येत आहे. यापूर्वी पोलिसांनी परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.