पाण्यातून मार्ग काढत चौकुळ ग्रामस्थांचा प्रवास
प्रतिनिधी / सावंतवाडी:
चौकुळ-खासकीलवाडी, पाणंदवाडी, गोगणेवाडी येथील ग्रामस्थांना चौकुळ -पाणंदवाडी नदीला पूल अथवा साकव नसल्याने पावसाळय़ात चौकुळ आणि आंबोलीत येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ऑक्टोबरपर्यंत ही परिस्थिती असते. ग्रामस्थ कंबरभर पाण्यातून जीव मुठीत धरून पावसाळय़ात अलिकडे चौकुळ आणि आंबोलीत येत असतात. अनेक वर्षे दळणवळणाची साधन नसल्याने या वाडीतील ग्रामस्थांनी अलिकडे चौकुळच्या विविधवाडीत स्थलांतर केले आहे. परंतु या वाडीतील लोकांचा उदरनिर्वाह दुग्ध उत्पादनावर अवलंबून असल्याने कसरत करावी लागत असूनही ते या वाडीत राहत आहेत.
या वाडय़ांना जोडण्यासाठी चौकुळ-पाणंदवाडीत पूल अथवा साकव झाल्यास गेली कित्येक वर्षे सुरू असणारी या वाडीतील ग्रामस्थांची हालअपेष्टा संपणार आहे. पुल अथवा साकव होण्यासाठी येथील ग्रामस्थ आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. शासनाने आणि लोकप्रतिधिनीही त्यांच्या मागणीकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनीही आता या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून त्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जेणेकरून या वाडीतील ग्रामस्थ विकासाच्या मुख्य
प्रवाहात येतील
चौकुळ-खासकीलवाडी, गोगणेवाडी, पाणंदवाडी येथे तीसहून अधिक कुटुंब राहतात. या वाडीत जाण्यासाठी दळणवळणाची साधने नाहीत. गेली अनेक वर्षे ही परिस्थिती आहे. दळणवळणाची साधने नसल्याने लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ लागला. त्यामुळे या वाडीतील काही ग्रामस्थांनी चौकुळ जळववाडी येथे स्थलांतर केले. तर काही ग्रामस्थ पारंपरिक दुग्ध व्यवसाय असल्याने तेथेच राहिले. स्थलांतर केलेले ग्रामस्थही व्यवसायामुळे अजूनही या वाडय़ांशी संपर्क ठेवून आहेत. परंतु दळणवळणाच्या साधनांअभावी हालअपेष्टा कायमच्या झाल्या आहेत. त्यातून कायमची सुटका व्हावी, या आशेवर ग्रामस्थ आहेत. त्यासाठी चौकुळ- पाणंदवाडी नदीवर पूल अथवा साकव उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले.
दूध पोहोचविण्यासाठी कसरत
पावसाळय़ात ऑक्टोबरपर्यंत ग्रामस्थांना पाणंदवाडी नदीतील कंबरभर पाण्यात जीव मुठीत धरून चौकुळ, आंबोली येथे यावे लागत आहे. दूध डेअरी अथवा ग्राहकांपर्यत पोहोचवावे लागत असल्याने ही कसरत सातत्याने करावी लागत आहे. या कसरतीतून मुक्तता मिळण्यासाठी आता ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या नदीवर पूल अथवा साकव बांधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
धनगर बांधवांची संख्या अधिक
या तीनही वाडीत तीसहून अधिक कुटुंब राहतात. त्यात धनगर बांधवांची संख्या जास्त आहे. त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने दूध व्यवसायावर असतो. त्यांना दळणवळणाची साधने मिळाल्यास या भागातील विकासालाही चालना मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी पाणंदवाडी नदीला पूल अथवा साकव नसल्याने ग्रामस्थांना पावसाळय़ात गैरसोईंना सामोरे जावे लागते. दळणवळण नसल्याने काहीजणांनी स्थलांतर केले आहे. परंतु व्यवसायामुळे या वाडीत जावे लागत आहे, असे स्पष्ट केले.