कोरोनाकाळात अनेकांचं जीवन अस्ताव्यस्त झालं. नोकर्या गेल्या. पुरुषांनाच नाही तर महिलांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागला. नोकरी हातची गेल्याने आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र परिस्थिती कितीही बिकट असली तरी हरायचं नाही हीच भावना कायम ठेऊन पुढे जायला हवं. भुवनेश्वरच्या स्मृतिरेखा बेहरा यांनीही नोकरी गेल्यनंतर हार मानली नाही. त्यांची ही संघर्षकथा अनेकींना प्रेरणा देऊन जाईल.
शिक्षिकेची नोकरी, चांगला पगार, आर्थिक स्थैर्य असं आयुष्य उपभोगणार्या स्मृतिरेखा बेहरा यांच्या आयुष्यात कोरोना एक वादळ घेऊन आला. कोरोनाकाळात शाळा बंद झाल्या आणि अनेकांच्या नोकर्यांवर गंडांतर आलं. स्मृतिरेखा यांच्याबाबतीतही असंच घडलं. स्मृतीरेखा प्राथमिक शिक्षिका होत्या. मुलांना शिकवण्याचं काम त्या इमानेइतबारे करत होत्या. स्मृतिरेखा या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. मात्र कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या. शाळांनाही नाईलाजाने कर्मचार्यांना कमी करावं लागतं. स्मृतिरेखा यांचीही नोकरी गेली. पण नोकरी गेली म्हणून त्या खचल्या नाहीत. सर सलामत तो पगडी पचास या म्हणीप्रमाणे त्यांनी इतर मार्ग अवलंबवायला सुरूवात केली. त्यांनी मग भुवनेश्वर महापालिकेत नोकरी पत्करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वाहनचालकाची नोकरी स्वीकारली. शिक्षिका म्हणून काम केलेल्या स्मृतिरेखा यांना याबाबत कोणताही कमीपणा वाटत नव्हता.
स्मृतिरेखा यांचे पती खाजगी क्षेत्रात कामाला होते. कोरोनाकाळात त्यांचा पगारही अर्धा झाला. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणं कठीण होऊन बसलं. पण परिस्थिती विपरित झाली म्हणून स्मृतिरेखा डोक्याला हात लावून बसल्या नाहीत. त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं. महापालिकेच्या कचरा गोळ्या करणार्या गाडीच्या वाहन चालक म्हणून त्या काम करू लागल्या. त्या गाडी घेऊन घरोघरी जाऊ लागल्या. अर्थात स्मृतिरेखा यांचा झगडा इथेच थांबला नाही. मधल्या काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आईला कर्करोगाचं निदान झालं. आईच्या उपचारांसाठी त्यांना पैसा हवा होता. मग स्मृतिरेखाने मागेपुढे पहिलं नाही. मिळेल ते काम हातात घेतलं आणि आयुष्याचा गाडा हाकायला सुरूवात केली.
स्मृतिरेखा आयुष्याबद्दल खूपच सकारात्मक आहे. नशीबाने आपल्याला साथ दिल्याचं त्या सांगतात. मी सुशिक्षित असल्यामुळे नोकरी मिळायला अडचण आली नाही. मी पडेल ती नोकरी स्वीकारली असं त्यांचं म्हणणं आहे. स्मृतिरेखाने पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी मिळवली आहे. मात्र पदवीधर असूनही कचरा गाडी चालवण्याचं काम करण्यात त्यांना अजिबात लाज वाटत नाही. कोणतंही काम कमी नसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. स्मृतिरेखाला पतीचा पाठिंबा मिळाला आाहे. तो पत्नीचं खूप कौतुक करतो. तिच्या मेहनतीचा त्याला खूपच अभिमान आहे. आयुष्यात मार्ग हा मिळतोच फक्त तो शोधायला हवा, असं तिच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.