भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील : सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
कॅबिनेट मंत्र्यांने महिलेसोबत संबध ठेवणे आणि त्याची स्वत:हून कबुली देणे असे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच घडले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणामुळे राज्याच्या प्रतिमेला डाग लागला आहे. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री, शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करुन मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोग योग्य दखल घेईल
चंद्रकांत पाटील म्हणाले, धनजंय मुंडे यांनी घटनेच्या चौकटीत न बसणारे काम केले आहे. हिंदू कायद्याप्रमाणे दोन लग्ने करता येत नाहीत. त्यासाठी पहिल्या पत्नीचा घटस्फोट व्हावा लागतो. ही माहिती त्यांनी निवडणुकीत अर्ज भरतानाही दडवली आहे. आयोग याची योग्य दखल घेईल.
पोलिसांवर दबाव
पोलीस दबावाखाली आहेत, असा आरोप करीत ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका युवक कार्यकर्त्यांने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली. मात्र त्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता आम्हाला खोलात जावे लागले. या प्रकरणी केंद्राच्या महिला आयोगाकडे दाद मागणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
पवार गांभिर्याने दखल घेतील
राजकारणातील संकेताला, घटनेला हे धरुन नाही. त्यांनी स्वत:हून राजीनामा देणे योग्य होईल. शरद पवार नैतिकतेचे राजकारण करतात. त्यांनी 50 वर्षात शुद्ध राजकारण केले आहे. त्यामुळे याप्रकरण ते गांभिर्याने घेतील असे वाटत, अशी टिप्पण्णीही चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंडेंच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण
मुंडे यांच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले हे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे. त्यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. त्यांनी स्वत: कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही विचार करावा. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणीने मांडली आहे. पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. त्यानंतर आम्ही आमची मागणी करू. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते
मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते
मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी अथवा तिच्यापासूनची मुले यासंबंधीची माहिती लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदू विवाह प्रतिबंधक कायदा 1946 नुसार दोन लग्न करणे, मुलांची माहिती लपवून ठेवणे हा गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याचाही धोका संभावतो. ही बाब प्रतिज्ञापत्र खोटे सादर केल्याचा पुरावा होऊ शकते.ऍड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते
आमदारकीस धोका नाही
मुंडे यांनी दुसरे लग्न केल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात केवळ लग्न झाले का आणि मुले किती, याबाबत माहिती विचारली जाते. त्याप्रमाणे कायदेशीर लग्नाबाबत माहिती दिलेली आहे. दुसऱया पत्नीने त्यांच्याविरोधात तक्रार दिलेली नाही. परंतु बलात्कारच्या प्रकरणाबाबत राजकारणात त्यांना किंमत मोजावी लागेल, असे दिसते. कायदेशीरदृष्टÎा त्यांची आमदारकी रद्द होण्याचा धोका नाही. उल्हास बापट, घटनातज्ञ