प्रतिनिधी /तिसवाडी
दर वषी दिवाळी सण हिंदू बांधवांसाठी मोठी पर्वणीच असते. लहानथोर या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वषी कोविड 19 चे संक्रमण गोव्यात चालू होते. यंदा या सावटाखाली दिवाळी साजरी होणार आहे. याकाळात आबालवृद्धांचा जल्लोष व उत्साह कायम राहणार आहे.
धनत्रयोदशीने अर्थात धनतेरसने मंगळवार दि. 2 नोव्हेंबर पासून सलग पाच दिवस हिंदू बांधव दिवाळी साधेपणाने पण उत्साहात साजरी करणार आहेत. देवांचा वैद्य धन्वंतरी यांची जयंतीही याच दिवशी साजरी होणार आहे. जन्मदिन म्हणून त्यांच्या मुर्तीची पूजा केली जाते. यावेळी घराघरांत धनधान्य आलेले असते. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाचा आनंद लोकांनी लुटलेला असतो. पावसाळा जवळ जवळ संपलेला असतो. धनत्रयोदशीला शेतात पिकलेल्या भाताची कणसे घराच्या प्रवेशदाराच्या तोरणाला बांधली जातात. यास अपवाद असू शकतो. यावेळी धनत्रयोदशीचे आगळेवेगळे स्वरूप पहायला मिळते.
दिवाळीच्या काळात खाण्याला फार महत्व असते. घरांत तऱहे तऱहेचा फराळ केला जातो. पोहे केले जातात. गोव्यात विपुल प्रमाणात भात पिकत असल्याने या भातापासून फराळासाठी पोहे बनवतात. या व्यतिरिक्त गोड, तिखट व अन्य खाण्याचे प्रकारही केले जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी शास्त्रानुसार दक्षिणेच्या दिशेला एक जळती पणती लावली जाते. ती पणती यमाच्या नावाने लावतो. पेटत्या पणत्यांची आकर्षक आरास केली जाते.
दिवेलागणीला घरात, आस्थापनात धान्याची पूजा केली जाते. कांही लोक सोन्याच्या नाण्यांचीही पूजा करतात. धन्वंतरी त्रयोदशी पुजा याच दिवशी साजरी होते. देवांचे वैद्य हे आयुर्वेदांचे जनक मानले जातात, यांचेही पूजन होते. हा सण साजरा करण्यामागे एक विशिष्ट हेतु असल्याचे शास्त्राकार सांगून गेले आहेत. यमराजाने असा वर दिला होता की, मानवजातीला अकाली मरण येऊ नये. तो खरा ठराविण्यासाठी प्रत्येक जणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळीच औषधोपचार करून आरोग्य तंदुरुस्त ठेवले पाहिजे. यासाठी धन्वंतरीची जयंती साजरी केली जाते. आयुर्वेदाच्या विशेष शास्त्राचा सन्मान याच दिवशी होतो. आरोग्याचे रक्षण व यमाचा वर सार्थ करायचा असल्यास आपल्या हातून प्रत्यक्ष चांगली कृती घडली पाहिजे.
विद्दुत रोषणाई कितीही आकर्षक वाटली तरी दिवाळीला तेलाचा दिवा लावला जातो. तिळाच्या तेलालाही बरेच महत्व असते. या दिव्याला देवत्व बहाल केलेले आहे. तेलाच्या दिव्याचा उजेड हा औरच असतो. विद्युत रोषणाईसुध्दा फीकी पडते. दिवाळीच्या पाचही दिवसांत तेलाचे दिवे लावणे हे आपल्या हिंदु संस्कृतीत रूढ झालेले आहे. विविध प्रकारचे आकाशकंदिलसुध्दा दिवाळीच्या काळात प्रकाशाची भर घालते.