बलाढय़ ऑस्ट्रेलियालाही 8 गडी राखून धूळ चारली, रोहित शर्मा-केएल राहुल बरसले
दुबई / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया व शेवटच्या सराव सामन्यात 8 गडी राखून एकतर्फी विजय संपादन करत टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपण पूर्ण सुसज्ज असल्याचा दाखला दिला. आवश्यकता भासल्यास सहाव्या गोलंदाजाची चिंता मात्र या लढतीत देखील कायम राहिली. स्वतः विराट कोहलीने येथे 2 षटके गोलंदाजी केली आणि यात 12 धावा दिल्या.
विराट कोहली फक्त गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. फलंदाजीत रोहित शर्मा (41 चेंडूत 60 धावांवर निवृत्त) आणि केएल राहुल (31 चेंडूत 39) यांनी आपला बहारदार फॉर्म येथेही कायम राखला. या लढतीत ऑस्ट्रेलियाने 5 बाद 152 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात भारताने 17.5 षटकात 2 बाद 153 धावांसह एकतर्फी विजय नोंदवला.
कोहली फलंदाजीला उतरला नाही. त्याच्या गैरहजेरीत तिसऱया स्थानी सुर्यकुमार यादवने 27 चेंडूत नाबाद 38 धावांचे योगदान दिले. हार्दिक पंडय़ाने चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरत 8 चेंडूत नाबाद 14 धावा फटकावल्या. त्याच्या षटकारानेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
भुवनेश्वर कुमारला (4 षटकात 1-27) सूर सापडला, ते भारतासाठी दिलासा देणारे ठरले. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वरची गोलंदाजी महागडी ठरली होती. पहिल्या दोन लढतीनंतर भारताची फलंदाजी लाईनअप आता जवळपास निश्चित झाली असून पाच स्पेशालिस्ट गोलंदाजही निश्चित आहेत. मात्र, हार्दिक पंडय़ा अद्याप गोलंदाजी करु शकत नसल्याने सहाव्या गोलंदाजी पर्यायाची समस्या कायम आहे.
पंडय़ा प्रत्यक्ष टी-20 विश्वचषक लढतींना प्रारंभ झाल्यानंतर गोलंदाजी सुरु करेल, असे रोहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. या लढतीत सहाव्या गोलंदाजाची जागा भरुन काढण्यासाठी स्वतः विराटने 2 षटके गोलंदाजी केली.
भारताने पहिल्या 5 षटकात 58 धावांची लयलूट करु दिली, ही आणखी एक चिंतेची बाब ठरली. या आघाडीवर भारताला सुधारणा करणे भाग असणार आहे. कोहली, बुमराह व शमी यांना या लढतीसाठी विश्रांती दिली असल्याचे हंगामी कर्णधार या नात्याने नाणेफेकीसाठी मैदानात उतरलेल्या रोहितने सांगितले. मात्र, नंतर विराट 2 षटके गोलंदाजीसाठी आला होता.
कांगारुंची खराब सुरुवात
प्रतिस्पर्धी कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाची पाहता पाहता 3 बाद 11 अशी मोठी पडझड झाली. डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म या लढतीत देखील कायम राहिला. तो अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला. पुढील चेंडूवरच अश्विनने बर्थडे बॉय मिशेल मार्शला स्लीपमधील रोहितकरवी झेलबाद केले.
रविंद्र जडेजाने फिंचला पहिल्याच चेंडूवर पायचीत करत कांगारुंना आणखी एक धक्का दिला. यामुळे, मधल्या फळीवर दडपण असणे साहजिक होते. मात्र, स्टीव्ह स्मिथ (48 चेंडूत 57) व बहरातील ग्लेन मॅक्सवेल (28 चेंडूत 37) यांनी 61 धावांची भागीदारी साकारत संघाला काही प्रमाणात सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे, मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप फटक्याचा उत्तम वापर केला तर स्मिथने स्ट्राईक रोटेट करण्यावर अधिक भर दिला. स्मिथने यादरम्यान शार्दुल ठाकुरला 17 व्या षटकात सलग 3 चौकारासाठी पिटाळून लावले. स्टोईनिसकडून षटकार व चौकार बसलेल्या वरुण चक्रवर्तीला 2 षटकात 23 धावा मोजाव्या लागल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 20 षटकात 5 बाद 152 (स्टीव्ह स्मिथ 48 चेंडूत 7 चौकारांसह 57, ग्लेन मॅक्सवेल 28 चेंडूत 5 चौकारांसह 37, मार्कस स्टोईनिस 25 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 41. अश्विन 2-8, भुवनेश्वर, जडेजा, राहुल चहर प्रत्येकी 1 बळी).
भारत ः 17.5 षटकात 2 बाद 153 (रोहित शर्मा 41 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 60 धावांवर निवृत्त, केएल राहुल 31 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 39, सुर्यकुमार यादव 27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 38, हार्दिक पंडय़ा 8 चेंडूत नाबाद 14. ऍस्टॉन ऍगर 1-14).
ऑस्ट्रेलियातर्फे 8 जणांची गोलंदाजी, यश मात्र फक्त ऍगरला!
भारताविरुद्ध या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने चक्क 8 जणांकडून गोलंदाजी करवून घेतली आणि यात फक्त ऍस्टॉन ऍगरला यश मिळाले. ऍगरने 2 षटकात 14 धावात 1 बळी असे पृथक्करण नोंदवले. मिशेल स्टार्क (2 षटकात 0-14), पॅट कमिन्स (4 षटकात 0-33), ऍडम झाम्पा (3 षटकात 0-29), केन रिचर्डसन (1.5 षटकात 0-20), स्टोईनिस (2 षटकात 0-16), मिशल मार्श (2 षटकात 0-17), ग्लेन मॅक्सवेल (1 षटकात 0-10) या अन्य 7 गोलंदाजांची पाटी मात्र कोरीच राहिली!