तिवरे धरण फुटीत शुभमने गमावले आई-भाऊ, -मित्रांच्या प्रेमाने निराशा झटकत केली ‘दहावी’ सर
प्रतिनिधी/ चिपळूण
तिवरे धरण दुर्घटना… 2 जुलै 2019ची काळरात्र… अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून गेली. कधीही न भरणारे घाव अनेकांच्या मनावर घातले गेले. तिवरे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेणाऱया भेंदवाडीतील शुभमने या दुर्घटनेत आपल्या आई व भावाला गमावले आणि त्याचे आयुष्यच काळवंडले, पण मित्रांच्या प्रेमाने या उद्ध्वस्त बालमनाला पुन्हा धुमारे फुटले. काळवंडलेल्या ढगांना आशेची किनार मिळाली आणि पूर्णपणे नैराश्येत गेलेल्या शुभमने दहावी पार केली. दहावी परीक्षेत त्याने 45.20 टक्के गुण मिळवले असले तरी यानिमित्ताने त्याने मुख्य प्रवाहात पुन्हा घेतलेली उडी कौतुकास्पद ठरत आहे.
आज डिप्रेशन म्हणजेच नैराश्य परवलीचा शब्द ठरत आहे. यातून अनेकांनी आपले जीवन संपवण्यापर्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. पण तुमच्या जवळपास मित्र, आप्तीयांची घट्ट वीण असेल तर त्यांच्या प्रेमाचा हात तुम्हाला कुठल्याही गर्तेतून बाहेर काढू शकतो, असा विश्वास शुभमच्या भरारीतून मिळू शकतो. 2 जुलै 2019ची तिवरे धरण दुर्घटनेची काळरात्र शुभमच्या आयुष्यात न भरणारे नुकसान करून गेली. या दुर्घटनेत त्याचा आकले येथील मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा भाऊ संदेश व आई सुशीला पाण्याच्या प्रवाहासह वाहून गेले. यामुळे आयुष्यात महत्वाच्या टप्प्यात दहावीत शिक्षण घेणाऱया शुभमने मातृछत्रासह मोठा भाऊ गमावला. वडील विश्वास धाडवे, बहीण सिद्धी व आजीचाच काय तो आधार त्याला राहिला. पण हे आधारवडही दुर्घटनेच्या धक्क्याने पूर्णपणे कोलमडलेले. त्यामुळे सावरायचं कुणी, कुणाला हा प्रश्न होता.
अशा कठीण प्रसंगी शुभम पूर्णपणे कोलमडला. दहावीची परीक्षा देणे तर दूरच पण त्याला पुन्हा जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच मोठे आव्हान होऊन बसले. दिवसेंदिवस नैराश्येच्या गर्तेत ओढल्या जाणाऱया शुभमला बाहेर काढणे गरजेचे होते. अशा प्रसंगी तिवरे गाव, भेंदवाडीसह त्यांची शाळा तिवरे न्यू इंग्लिश स्कूल त्याच्या मदतीला धावली. त्याचे मित्र त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. विद्यालयीन कर्मचाऱयांनी त्याला वर्षभर प्रेमाने, मायाने, आपुलकीने सांभाळले. मुख्याध्यापक रघुनाथ राजाराम जाधव, सहाय्यक शिक्षक शंकर मिसाळ, श्रीधर जोशी, रवींद्र गवळे, भारती देसावळे, विजय जांभळे, शिपायी कृष्णाजी शिंदे, विश्वास रामाजीराव शिंदे त्याच्या पाठीशी उभे राहिले. समाजाकडून, विविध मंडळाकडून आलेली शैक्षणिक, आर्थिक मदत त्याच्याकडे वेळोवेळी सोपवली.
विद्यालयातील विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी त्याला प्रेमाचा खरा आधार दिला. त्याच्या दुःखावर मैत्रीच्या फुंकणीने हळुवार फुंकर घातली. त्याला सर्वजण नाना म्हणतात. नाना सर्वाचाच नाना झाला. त्याच्या चेहऱयावरील नेहमीची प्रसन्नता दिसली की आतून तो किती दुःखीकष्टी आहे, याचा थांग लागायचा नाही. संपूर्ण वर्गच त्याचा मित्र असायचा, पण त्याची निखळ मैत्री जमली ती प्रणय प्रभाकर शिंदे याच्याशी. तोही दहावीत 81 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. तो शाळेत एखाद्या दिवशी जरी नाही आला तरी त्याची काळजी वाटायची. दुर्घटनेनंतर वडील त्याला पुण्याला नेणार होते, पण तो शाळेतच राहिला व सर्वांच्या प्रेमाच्या जीवावर पुन्हा ‘उभा’ राहिला. त्याची गुणांची पुंजी फार नसली तरी त्याला मिळालेले माणुसकीचे पाठबळ फार मोठे असल्याने तो त्या जीवावर यशस्वी वाटचाल करील, यात शंका नाही.