महामुनी शुकदेवांनी सांगितले की भगवंताने आणखी सोळा हजार स्त्रियांबरोबर विवाह केला. भौमासुराच्या बंदीखान्यात ज्या कन्या होत्या, त्यांना कृष्णाने सोडविले व त्यांच्याशी विवाह केला. यावर राजा परिक्षितीने प्रश्न केला – हा भौमासूर कोण? त्याने आपल्या बंदीखान्यात स्त्रियांना का बंद करून ठेवले होते? त्या भौमासुराचा बंदोबस्त कृष्णाने कसा केला? त्या कन्यांशी भगवंताने विवाह कशासाठी केला?
आपण या भौमासुराला नरकासुर या नावाने ओळखतो. पुराणानुसार नरकासुर हा एक प्रसिद्ध असुर होता. हा पृथ्वीच्या गर्भातून जन्मला होता. भूमीतून जन्म झाल्याने याला भौमासूर असेही म्हणतात. नरकासुराचा जन्म त्याच स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजेच सीतेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर 16 वर्षांचा होईपर्यंत त्याचे पालन पोषण केले. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेचा राजा कंस याचा असुर मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याची त्याचा विवाह झाला, त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्भेध रथ दिला. काही दिवसांपर्यंत तर नरकासुर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता. पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वशि÷ऋषींनी नरकासुराला विष्णूच्या हातून मारले जाण्याचा शाप दिला. महामुनी शुकदेव पुढील कथा सांगतात – द्वारकेमाजि वसतां हरि । इंद्रें येऊनि दीनापरी । भौमचेष्टित परोपरी । करुणोत्तरिं श्रुत केलें। अमृतस्रावी वरुणच्छत्र । हरिता जाला धरित्रीपुत्र। मान भंगोनि क्लेशपात्र । संतप्तगात्र सुरवर्य । लोकपाळांमाजि वर्ण । तत्प्रभुत्वें संक्रंदन । हरिलें भंगोनि आतपत्राण। मरणासमान श्रम मानी । बंधु म्हणिजे माता अदिति । भौमें तिचिया कुंडलांप्रति । हिरूनि नेलिया हृदयीं खंती। मानी सुरपति बहुसाळ। अमरलोकीं मणिपर्वत। विचित्रधातुरत्नमंडित । प्राग्ज्योतिष नगर तेथ। भौमें रचिलें प्रतापें । इत्यादि दु:खें दिवस्पति। हृदयीं स्मरूनि कृष्णाप्रति । विदित करूनि केली विनंती। भौमदुर्मतिहननार्थ ।
वरुणाचे छत्र महाबलवान भौमासुराने हिसकावून घेतले होते. देवांची माता अदितीची कुंडले हरण केली होती आणि मेरु पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थानही भौ?मासुराने हिसकावून घेतले होते. ही हकिकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली. त्याने कृष्णांना हात जोडून विनंती केली की आपण या भौमासुराचा बंदोबस्त करावा. कोणे समयीं कोणे ठायीं । इंद्रें प्रार्थिला शेषशायी। हें तूं राया पुससी कांहीं । तरी तें सर्वही तुज कथितों। वाराहपुराणींचासंकेत। भूमिदेवीनें भगवंत। प्रार्थनि भौमासुराचा घात। न करिं म्हणोनि याचिला।तेव्हां भूमिदेवीतें हरि । अभय देऊनि प्रतिज्ञा करी । तुझिये आज्ञेवेगळा न मरिं । जाण निर्धारिं भौमा मी । तिये भूमिदेवीचा अंश । जाणोनि सत्यभामा प्रत्यक्ष । सवें घेऊनि जगदधीश । भौमवधास पैं गेला ।
परिक्षिती राजाने प्रश्न केला – महामुनी! इंद्राने कृष्णापाशी ही विनंती केव्हा, कुठे केली?
Ad. देवदत्त परुळेकर