@ प्रतिनिधी/ बेळगाव
खोदलेले रस्ते… अर्धवट गटारींचे बांधकाम, ठिकठिकाणी उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा आणि बंद पथदीप अशा विविध समस्यांच्या विळख्यात बेळगाव शहर सापडले आहे. अशातच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. धर्मनाथ चौक ते रामदेव हॉटेलपर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्याचे काम रखडले आहे. दुसऱया बाजूचा रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.
धर्मनाथ चौक ते इएसआय हॉस्पिटलमार्गे राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या अशोकनगर येथील रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले काम रखडले असल्याने रहिवाशांना अनेक समस्यांची डोकेदुखी बनली आहे. येथे असलेल्या गटारीपेक्षा नव्याने गटारी उंच बांधण्यात आल्या आहेत. नव्या डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करताना जुन्या डेनेज वाहिन्यांची मोडतोड झाली आहे. पण पावसामुळे हे काम पूर्ण झाले नाही. परिणामी सांडपाणी व पावसाचे पाणी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात साचून राहिल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी उघडय़ावर सोडण्यात आल्यामुळे रहिवाशांना विविध आजार जडले आहेत.
शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्य शासन आणि महापालिका प्रशासन आटापिटा करीत आहे. पण शहराची झालेली अवस्था पाहता सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लॉकडाऊनमुळे सुरू असलेली कामे पूर्ण करता आली नाहीत. पण जून महिन्यात पावसाला सुरुवात होते, याची माहिती स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनाला असूनही आवश्यक कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष केले होते. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी काही रस्ते खोदण्यात आले आहेत. धर्मनाथ चौकाला जोडणाऱया सर्व रस्त्यांचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे. सदर कामे सुरू करून अडीच वर्षे झाली तरी येथील रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. एसपी ऑफीस ते धर्मनाथ चौकमधून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता, धर्मनाथ चौकामधून रामदेव हॉटेलपर्यंतच्या रस्त्यासह विविध रस्त्यांच्या एकाच बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुसऱया बाजूचे काम अर्धवट आहे. काही रस्त्याशेजारी गटारी बांधण्यासाठी खोदाई करण्यात आली असून, बांधकामदेखील अर्धवट झाले आहे. त्यामुळे गटार बांधकाम करण्यासाठी घालण्यात आलेल्या लोखंडी सळय़ा उघडय़ावर आहेत. काँक्रिटीकरण व रस्त्यांच्या खोदाईमुळे पथदीप बंद आहेत. त्यामुळे शहरवासियांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एकीकडे रस्त्यांची खोदाई, गटारींचे अर्धवट बांधकाम आणि दुसरीकडे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. विकासकामे राबविताना शहरवासीयांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अशोक नगरमधील रस्त्यांच्या विकासासाठी दोन्ही बाजूने खोदाई करून काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण करून नंतर दुसऱया बाजूने काम सुरू करावे, अशी विनंती येथील रहिवाशांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. दोन्ही बाजूच्या गटारी खोदून ठेवण्यात आल्याने एक ना धड…. भाराभर चिंद्या अशी अवस्था स्मार्ट सिटी योजनेतील कामांची झाली आहे. येथील घरांपेक्षा उंच रस्ता आणि गटारी करण्यात येत आहेत. यापूर्वी असलेल्या गटारीपेक्षा दीड फूट उंच नव्या गटारी बांधण्यात आल्या आहेत. डेनेज वाहिन्या व विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यामुळे रहिवाशांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. वृद्ध, लहान मुले व महिलांना घरांतून रस्त्यावर येताना अडचणीचे बनले आहे. घरापासून रस्त्यापर्यंत दहा फूट लांबीची चर खोदण्यात आल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी घसरून गटारीत पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशा विविध समस्यांच्या विळख्यात अशोकनगर परिसर अडकला आहे. दुर्घंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱयांना संपर्क साधून तक्रार केली असता याची दखल घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. सदर काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत असून येथील समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने अधिकाऱयांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटीसाठी अशोकनगर येथील गटारींचे काम हाती घेऊन दोन वर्षे होत आली, पण अद्यापही हे काम अपूर्णच आहे. डेनेज वाहिनीचे पूर्ण नुकसान करण्यात आल्याने मैलायुक्त सांडपाणी खोदण्यात आलेल्या चरीमध्ये साचून आहे. यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. काही कुटुंबातील सदस्यांना डेंग्यूने ग्रासले आहे. वयोवृद्धांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले असल्याने घरात बसून राहावे लागत आहे. याबाबत तक्रारी करूनही स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी फिरकून पाहत नाहीत, असा आरोप रहिवासी करीत आहेत. स्मार्ट सिटी निर्माण करण्यासाठी विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण कामाची गती आणि दर्जा पाहता सदर काम अयोग्य आहे. विकासकामे राबविताना परिसराचा अभ्यास न करता अवैज्ञानिक पद्धतीने कामकाज करण्यात येत आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळे कामाची पाहणी करून विकासकामे व्यवस्थित राबविण्यात यावीत व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.