चेन्नई / वृत्तसंस्था :
जगातील सर्व धर्मांचा सन्मान करण्याची भावना भारतीयांच्या रक्तातच आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कुठल्याही धर्माचा अपमान किंवा कुणाचेही तुष्टीकरण नसल्याचे उद्गार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात काढले आहेत. श्रीरामकृष्ण मठाच्या रामकृष्ण विजयम या मासिक पत्रिकेच्या शताब्दी वर्षानिमित्र आयोजित कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपतींनी शोषित लोकांना दीर्घकाळापासून भारतात शरण मिळत राहिल्याचे म्हटले आहे.
संसदेत अलिकडेच संमत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचे हे विधान महत्त्वाचे ठरते. आम्ही अद्यापही पीडित लोकांना स्वीकारण्यास तयार आहोत. पण काही लोक या निर्णयाला विरोध करू पाहत असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.
स्वामी विवेकानंदांचे योगदान
भारताने भूतकाळात अनेक लोकांना शरण दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी दाखविलेला मार्ग लक्षात ठेवून त्याचा समाजात प्रसार केला जावा. स्वामी विवेकानंद यांनीच पाश्चिमात्य जगताला हिंदुत्वाची ओळख करून दिल्याचे उद्गार उपराष्ट्रपतींनी काढले आहेत.
अध्यात्माचे केंद्र
समाजसुधारक तसेच धार्मिक रुढींच्या विरोधात भूमिका घेणारे संत म्हणून स्वामी विवेकानंद यांची ओळख होती. त्यांनी नेहमीच मानवाच्या कल्याणासाठी काम केले आणि जात, वंशाला महत्त्व न देता समाजात अध्यात्मिकतेचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांनीच जगाला अध्यात्मिकतेचे महत्त्व सांगितले. पूर्ण जगासाठी भारत अध्यात्मिक गुरू राहिला आहे. मार्गदर्शन आणि अध्यात्मिकतेसाठी जग भारताच्या दिशेने पाहत असल्याचे नायडू म्हणाले.