प्रतिनिधी /बेळगाव
स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना फितुरीने पकडून हाल हाल करून मारण्यात आले. त्यांना झालेल्या वेदना या पिढीला समजाव्यात, या उद्देशाने शिवप्रतिष्ठानतर्फे प्रतिवषी बलिदान मासचे आचरण केले जाते. यावषीही फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (3 मार्च ते 1 एप्रिल) दरम्यान बेळगाव जिल्हय़ातील शिवभक्तांना बलिदान मास पाळण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला धर्मवीर संभाजी महाराजांना पकडण्यात आले. त्यांचा छळ करून एक एक अवयव काढण्यात आले. परंतु त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म सोडला नाही. ही घटना क्लेषदायक असल्याने आजही युवापिढी धर्मवीर बलिदान मासचे आचरण करते. कोणतीही एखादी सवय, अन्नपदार्थाचा त्याग करून बलिदान मासचे आचरण केले जाते. शेवटच्या दिवशी शहरात मूकफेरी काढून शोक व्यक्त करण्यात येतो.
ठिकठिकाणी बलिदान मास
बेळगाव शहर, तालुका, खानापूर, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी, संकेश्वर या परिसरात बलिदान मास पाळला जातो. यानिमित्त दररोज संध्याकाळी महाराजांच्या प्रतिमेसमोर पूजन व श्लोक म्हटले जातात. मागील काही वर्षांमध्ये बलिदान मास पाळण्यामध्ये पुरुषांसह महिलांचीही संख्या वाढली आहे. महाविद्यालयीन तरुणीही बलिदान मासचे आचरण करीत आहेत.
मुंडण करून बलिदान मासला प्रारंभ
बेळगावमध्ये बलिदान मासच्या पहिल्याच दिवशी धर्मवीर संभाजी चौकात पूजन केले जाते. संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या दिवशी काही तरुण मुंडण करून घेतात. प्रत्येक घरोघरी, गल्लोगल्ली बलिदान मास पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.