कोल्हापूर प्रतिनिधी
देशातील बेरोजगारी, गरीबी, वाढलेली महागाई, शेतकऱयांचे प्रश्न हे विषय बाजूला ठेवून भाजपच्या नेत्यांकडून केवळ हिंदूत्वाचा अजेंडा राबविला जात आहे. देशातील जनतेऐवजी मूठभर लोकांसाठी भाजपचे काम सुरु आहे. याच भाजपकडून प्रचाराच्या माध्यमातून शिव-शाहूंच्या नगरीत धर्मांधतेचे विष पेरण्याचे काम सुरु असून सामाजिक न्याय व्यवस्था प्रस्थापित करणाऱया महापुरुषांचा हा अपमान आहे. त्यामुळे जनहिताच्या योजना राबविण्यामध्ये आलेले अपशय लपवण्यासाठी केवळ देव, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱया भाजपला शाहूनगरी धडा शिकवेल असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पटोले कोल्हापूर दौऱयावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या रणनितीवर तोफ डागली. ‘खोट बोला, पण रेटून बोला’ ही भाजपची निती असून गेल्या सात ते आठ वर्षात भाजप सरकारने कोणत्याही समाजघटकाला न्याय दिला असल्याचा त्यांनी आरोप केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला भाजपने बाहेरील लोकांना आणले होते. पण त्यांना आणून स्थानिक मतदारांची मते मिळणार नसून भाजपची हार निश्चित आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
पटोले म्हणाले, प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा रेटणाऱया भाजपने कोरोना महामारीच्या काळात सुरुवातीस लस तयार झाल्यानंतर ती पाकिस्तानला मोफत वितरीत केली. यावेळी मात्र देशातील जनता लसीपासून वंचित होती. याच कालावधीत पवित्र गंगा नदीत कोरोना बळींचे हजारो मृतदेह पहावयास मिळत होते. ‘कथनी एक आणि करणी एक’ ही भाजपची वृत्ती आहे. कोल्हापूरच्या सुपूत्राची येथील जनतेने पुण्याला रवानगी केली. ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांना रामनवमी साजरी करण्याची आठवण झाली नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून रामनवमीचा मोठा उत्सव होत आहे. पण आम्ही देवाच्या नावाखाली मते मागत नाही. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी रामलल्लाची स्थापना करून मंदिर बांध्घ्ण्यासाठी भूमीपूजन केले. पण त्यांनी देव, धर्माच्या नावावर कधीही मते मागितली नाही. मी देखील रामभक्त आहे. पण राजकारणात कधीही देवाचा वापर केला नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
चुकीच्या धोरणांमुळे देशावर भारनियमनाचे संकट
पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर राज्य आणि देशावर वीज भारनियमनाचे संकट आहे. केंद्राच्या राजनितीमुळे देश अंधारात जाण्याची भिती आहे. एसटी कर्मचारी हे आमचे लोक आहेत. पण भाजपने त्यांना फुस लावून भडकवण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे धोरण राबविले. या हल्ल्याची चौकशी सुरु असून त्याचा बोलवता धनी कोण आहे ? हे लवकरच स्पष्ट होईल असे पटोले यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून द्या. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबत बसून कोल्हापूरसाठी जास्तीत जास्त निधी देऊन विकासाचे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही पटोले यांनी दिली.
भाजपची अघोषित आणिबाणी
जो कोणी केंद्रसरकारच्या धोरणाविरोधात बोलतो, त्याला ईडी आणि सीबीआयची चौकशी लावण्याची भिती दाखवली जाते. भाजपची ही आघोषित आणिबाणी कोल्हापूर उत्तरची जनता मोडून काढेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. राज्यसरकारने इंधनावर 52 रूपये कर आकारला असल्याचा फडणवीस यांचा आरोप आहे. पण भाजप सरकारच्या काळात जेवढे कर आकारले जात होते. तेवढेच कर आता आकारले जात आहेत. त्यामध्ये 1 रूपयाची देखील वाढ केली नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
फडणवीस नव्हे ईडीणवीस
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे ईडी लावून त्यांना पर्यायाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरु आहे. पण आजतागायत कोणत्याही नेत्यावर आरोप सिद्ध झाला नाही. राजकीय स्वार्थासाठी ईडीचा वापर करणारे फडणवीस आता ईडणवीस झाले असल्याचा आरोप पटोले यांनी केला.