उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन, परधर्माचा अवमान न करण्याचे आवाहन
कोट्टायम / वृत्तसंस्था
प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्याने तो आचरणात आणावा. तथापि, प्रक्षोभक भाषणे करुन इतरांच्या भावना दुखावू नयेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते केरळमधील या शहरात ख्रिश्चन संत कुरियाकोस इलास चावरा यांच्या 150 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करीत होते. हे संत समाजसुधारक होते.
प्रक्षोभक भाषणे केल्याने त्यांना तशाच भाषेत प्रत्युत्तर दिले जाते आणि त्यामुळे विविध समाजांमधील सौहार्दाच्या संबंधांना तडा जातो. त्यामुळे स्वतःचा धर्म आचरताना परधर्माविषयी अपशब्द उपयोगात आणू नये. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते. प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण करण्यावर भर द्यावा. हे पथ्य केवळ एका धर्माच्या लोकांनी नव्हे, तर सर्वच धर्मांच्या लोकांनी पाळले पाहिजे. अन्यथा तणाव निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तिरस्कार नको
अन्य समाजांची संस्कृती, परंपरा, चालीरिती, संस्कार, घटनात्मक अधिकार आणि भावना यांचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. किमानपक्षी त्यांचा अवमान होईल असे वर्तन करु नये. प्रत्येक भारतीय नागरीकाच्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे. त्यामुळे कोणीही हे धडे इतरांना विनाकारण देऊ नयेत. सरकारी किंवा खासगी शाळांमध्ये शिकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यावर समाजसेवा करण्याचे बंधन घातले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातच हे कार्य समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. यातून विद्यार्थ्यांना बालपणापासूनच इतरांचा आदर करण्याची सवय लागेल, जी सामाजिक सौहार्दासाठी हितावह ठरेल, अशी महत्वाची सूचना त्यांनी केली.
भारतीय मूल्ये जोपासा
विद्यार्थी दशेपासूनच सर्वांनी आपली पांरपरिक आणि आदर्श भारतीय मूल्ये जपण्याचा आणि संवर्धित करण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपली सुखदुःखे इतरांशी वाटून घेणे आणि इतरांना आदर देणे ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. तिचा अर्थ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. इतरांसाठी जगण्यातल्या आनंदाचा अनुभव आपण घेतला पाहिजे. यातून मोठे समाधान मिळते आणि स्नेहसंबंध निर्माण होतात, असेही प्रतिपादन नायडू यांनी केले.
संतांची हीच शिकवण
संत चावरा यांनी त्यांचे जीवन सामाजिक ऐक्यासाठी व्यतीत केले. समाजाची सेवा करण्यात त्यांनी धन्यता मानली. तोच त्यांचा संदेश होता. त्यांनी निर्माण केलेल्या संस्था आज हेच कार्य पुढे नेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवृत्तीच्या संताने मोठी कामे केली असून त्यांचा लाभ आज समाजाला होत आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.
ताणतणाव टाळा
प्रत्येक समाज घटकाने ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्वेषाला खतपाणी घातले जाऊ नये. तसेच कोणाच्या भावना विनाकारण दुखावल्या जाऊ नयेत याकडे लक्ष दिले पाहिजे, असा संदेश उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला. चावरा यांच्यासारखे संत आज समाजसाठी आवश्यक आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी स्वतःसमोर ठेवावा, असेही प्रतिपादन त्यांनी केले.