मी मुसलमान आहे, माझी पत्नी हिंदू आणि माझी मुले, ज्यांना शाळेत धर्म विचारला जातो, त्यांना मी त्यांचा धर्म भारतीय असल्याचे सांगितले आहे,’ असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याने केले आहे. भारतीय सिनेसृष्टीत अमिताभ बच्चनच्या बरोबरीने ज्याच्यावर रसिकांनी प्रेम केले अशा या कलाकाराने आपल्या आयुष्यातील अभिनय कारकिर्दीला नवे वळण लाभायची वेळ आलेली असताना केलेल्या वक्तव्याचे भारतभरातून कौतुक होत आहे. ‘धर्म भारतीय’ हा विचार तो सहज असेल किंवा सहेतूक असेल पण, बोलून गेला. एका अभिनेत्याने हे वक्तव्य केले याचे जितके कौतुक होत आहे तितकेच हे एक आवश्यक वक्तव्य असल्यामुळेही होत आहे. त्यामुळे शाहरूख जे बोलला तो विचार भारतातील असंख्य लोकांचा आहे. पण, जात, धर्म यांच्या अभिमानात सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंतचे सारे जग गुरफटलेले असताना केवळ भारतीयच त्यातून दूर राहतील असे म्हणता येणार नाही. त्यातही असंख्य जाती, धर्मांना, रूढी, परंपरांना, संस्कृतींना अंगिकारून युगानुयुगे वाटचाल करणाऱया भारतासारख्या प्रदीर्घ सांस्कृतिक वारसा लाभलेल्या देशात ते अशक्य कोटीतील आहे. पण, म्हणून येथे काही प्रयत्नच होऊ नयेत असे कोणत्याही काळात झालेले नाही. प्रत्येक काळात दुसऱयातील बऱया-वाईट गुणांचा अंगीकार करत भारत नावाचा एक मिश्र जनांचा समूह विकसित होत आलेला आहे. वैविध्यपूर्ण अशी संस्कृती ही भारताची केवळ ओळख आहे असे नव्हे तर त्याचे अनेक कंगोरे भारतीय मानसिकतेत दिसून येत असतात. त्यातीलच एक मानसिकता ही आपण कोणत्याही जातीधर्माचे असलो तरी आपण भारतीय आहोत ही एक प्रमुख मानसिकता आहे. त्यामुळेच जातीचे, धर्माचे आणि रक्ताचे नाते ओलांडून लोक एकमेकांना जोडलेले आहेत. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहिला जाताना त्यातील अनेक कंगोरे विचारात घेतले जातात. हिंदू सैनिकांना गायीच्या मांसापासून बनवलेले आवरण तोडून काडतूस वापरात आणावे लागायचे. त्याला विरोध करण्यापासून हा लढा सुरू झाला आणि त्याला संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचे स्वरूप प्राप्त झाले. पण, हा लढा ज्या सैनिकांनी सुरू केला ते एक एक ठिकाणे जिंकत जाताना त्यांना आपल्या सैन्याचा सेनापती कोण, आणि आपण जायचे कुठे हे ठरवायचे होते. तेव्हा त्यांनी आपला सेनापती किंवा राजा हा बहादूरशहा जफर यांना मानले आणि भारतीय विजयाचे प्रतीक म्हणून लालकिल्ल्यावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकावण्याचे उद्दीष्ट ठेवून वाटचाल सुरू केली. तर याच देशात रामाच्या मंदिरावरून फैजाबाद किंवा अयोध्येत दोन धर्मात प्रदीर्घ काळ तंटाही गाजला. ज्याला नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने तिलांजली देऊन टाकली आहे. हिंदू, बौद्ध, जैन, शिख असे धर्म आणि धर्मात सुधारणा सांगणारे अनेक पंथ भारतात जन्माला आले. त्यांचे आकर्षण जगाला वाटले आणि त्यातील अनेक जगभर पसरले. तसेच जगाच्या दुसऱया भागात जन्माला आलेले इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म अशाच पद्धतीने भारतापर्यंत पोहोचले. इतरही छोटे, मोठे अनेक धर्म भारतात आजही गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. वर्चस्ववादाच्या लढाईने यातील बहुतांश धर्माचे अनुयायी विविध कारणांनी परस्परांना भिडले. त्यांनी येथे राज्यही केले आणि त्यांच्या राज्याचा ठसा इथल्या लोकसंस्कृतीतही उमटत राहिला. धर्मांतर, रक्तांतर आणि अभिसरण होत राहिले. एक संघर्षाची आणि दुसरी संवादाची वाट कायम चालती राहिली. त्याचा प्रभाव भाषेपासून संस्कृती, चालीरितीपर्यंत सर्वावर पडला. त्यातून संघर्षाचे अनेक गंभीर प्रसंगही उभे राहिले. घनघोर लढायांपासून बौद्धिक वर्चस्वापर्यंत सर्व प्रकारच्या लढायांनी भारतीय मनाला व्यापले. या सर्वांतून भारत घडत गेला. नवा, नवा आकार येत गेला. प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांप्रमाणे त्या त्या काळाला एक नवे वळण मिळत गेले. गेल्या शतकात या देशात रूळलेल्या सर्व जाती, धर्मांच्यावर राज्य करणारा शासक बदलला. परंपरागत शासकांची जागा ब्रिटीशांनी घेतली. त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम भारतीय मनावर, समाजावर आणि धर्मविचारांवरही झाले. त्याचप्रमाणे पूर्वविचारांना मागे टाकून प्रागतिक बनणे हाही एक प्रमुख परिणाम झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सत्तेत देशाला जी दिशा मिळाली त्या दिशेने जाता जाता जनतेचे मन बदलले आणि 2014 साली सत्तांतर झाले. त्या सत्तांतरानंतर पुन्हा एकदा दिशा बदलली. आजच्या घडीला देशात धार्मिक, वांशिक आणि भाषिक लढायांचा काळ पुन्हा एकदा सुरू झाल्यासारखी स्थिती आहे. नेत्यांच्या वक्तव्यांनी त्यात अधिकचा वाद वाढताना दिसतो आहे. अशा काळात शाहरूखसारखा एखादा अभिनेता जेव्हा आपल्या मुलांचा धर्म भारतीय आहे असे म्हणतो, तेव्हा तो या देशाचे नवे कर्तेधर्ते बनू पाहणाऱया युवा वर्गाला खुणावत असतो. आपली वाटचाल कोणत्या दिशेने होणार, याबाबत गोंधळलेल्या युवावर्गाला शाहरूखने एक नवी वाट दाखवली आहे. अर्थात त्याचे परिणाम भविष्यात काय होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र त्याच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाने जेव्हा असे वक्तव्य केले तेव्हा त्यावर सकारात्मक चर्चा घडू लागेल एवढे नक्कीच. नाहीतर पी. सिंधुने जेव्हा पदक पटकावले तेव्हा भारतीयांनी तिच्या जातीची आणि धर्माची माहिती मोठय़ा प्रमाणावर सर्च केली हे गुगलने जाहीर केले. हे करण्यामागे भारतीय काय विचार करतात, हे जगासमोर आणण्याचा त्यांचा हेतू होता. त्यात ते यशस्वीही झाले. कारण, नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीला त्याचे गाव, शेजारी, नातेवाईक सहजपणे विचारण्याची आपल्याकडे प्रथा आहे. हे विचारण्यामागे बेरकी हेतू असतो तो त्या व्यक्तीची जात आणि इतर माहिती काढण्यासाठी काही धागा मिळविण्याचाच. ही रीती आता बदलायला हवी. त्यादृष्टीने शाहरूख जे बोलला तेच पुढच्या पिढय़ाही बोलू लागल्या तर या शतकाच्या पहिल्या 20 वर्षात जे प्रश्न न्यायालयाला निकालात काढावे लागले ते भविष्यात लोकांची मानसिकताच मोडीत काढेल. अर्थात हा आदर्शवादी विचार असला तरी त्याचा कधी ना कधी पूर्ण भारताला स्वीकार करावा लागेल हे निश्चितच! नव्या महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनापासून घटनेच्या उद्देशिकेचे वाचन शाळेत सुरू केले आहे. मुलांना ती पाठच आहे. फक्त ते पाठांतर कृतीत येण्यासाठी अनेक शाहरूख बोलते राहिले पाहिजेत.
Previous Articleनाग्याची व्यसनमुक्ती
Next Article शहरी सरकारी बँकांना 5 वर्षात 220 कोटींचा गंडा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.