कोलंबो
यजमान लंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्याला येथे मंगळवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल. या मालिकेतील रविवारचा पहिला सामना जिंकल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाला आहे.
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार धवन, ‘सामनावीर’ पृथ्वी शॉ, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची आक्रमक फटकेबाजी पाहवयास मिळाली. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी रविवारच्या सामन्यात लंकेच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीचा निर्णय घेतला होता. भारताने हा पहिला सामना 13 षटके बाकी ठेवून 7 गडय़ांनी आरामात जिंकला. मंगळवारच्या दुसऱया सामन्यात भारतीय संघामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मनिष पांडेला 26 धावा जमविताना 40 चेंडू खेळावे लागले. शॉ, यादव आणि इशान किशन यांच्या तुलनेत पांडेची फलंदाजी संथ झाली. पृथ्वी शॉ ने आक्रमक फटकेबाजी केली पण त्याला मोठी धावसंख्या रचता आली नाही. कुलदीप तसेच चहल यांना बऱयाच दिवसानंतर गोलंदाजी करण्याची संधी लाभली. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाकडून टिच्चून गोलंदाजी झाली. मात्र भुवनेश्वरकुमारला गोलंदाजीचा सूर मिळाला नाही. भारतीय संघामध्ये अनेक नवोदितांचा समावेश असून त्यांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष आहे.
पहिल्या सामन्यात लंकन संघ चांगल्या कामगिरीसाठी झगडत आहे. त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या नोंदवता आली नाही. करूणारत्नेच्या जलद 43 धावांच्या खेळीमुळे लंकेला पहिल्या सामन्यात 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. मंगळवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल या सामन्यात संथ खेळपट्टीवर दुसऱयांदा फलंदाजी करत विजय मिळविण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरस राहील.
भारत – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजु सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, के. गौतम, चहल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वरकुमार, साकारिया आणि सैनी.