प्रकल्पग्रस्थांकडून आंदोलनाचा इशारा
म्हासुर्ली / प्रतिनिधी
दुसऱ्यांच्या जीवनात पाण्याने सुख समृद्धी यावी यासाठी स्वतःचा प्रपंच विस्थापित केलेल्या राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नवीन वसाहतीत तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.परिणामी येथील महिलानां पाण्यासाठी एक किलो मीटरची पायपीट करावी लागत असून २१ वर्षे झाली तरी ही शासन उदासिनतेमुळे अद्याप धामणी प्रकल्पही पुर्णत्वास गेलेले नाही.
धामणी प्रकल्पासाठी हक्काची जमीन गेल्याने राई सह इतर गावातील शेकडो शेतकरी विस्थापीत झाले आहेत. शासनाने उभारलेल्या वसाहतीमध्ये आज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. इथल्या विस्थापितांना गट. क्र. ९९ व ८३ मध्ये अनुक्रमे दोन वसाहतींसाठी घरांना भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.
सदर वसाहतीसाठी रस्ते, वीज व पाण्याची मुबलक सोय केली जाईल,असे प्रशासनातर्फे धरणग्रस्तांना सांगण्यात आले होते. त्यानुसार २०१८/१९ साली मिळालेल्या भूखंडावरती प्रकल्पग्रस्तांनी नवीने घरे बांधली आहेत. यापैकी गट क्र. ८३ मधील विस्थापितांसाठी पाटबंधारे खात्याने गतवर्षी कुपनलीकेची सोय केली.परंतु अवघ्या तीन महिन्यातच ही योजना मृगजळ ठरुन ती कुपनलीकाच आटली आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासुन प्रकल्पग्रस्तांना वसाहतीपासुन दुर एक कि.मी.वर असणाऱ्या मांडवकरवाडी येथून पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे.
तर धरणग्रस्त वसाहतीसाठी नदीवरील नळ पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरी अपुरे राहिलेली योजनेची कामे पाटबंधारे विभागाने लवकर पूर्ण करून प्रकल्पपग्रस्तांच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.अन्यथा कार्यकारी अभियंता कोल्हापुर कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे.