प्रशासनाचे दुर्लक्ष,पाण्यासाठी १ किमीची पायपीट
युवराज भित्तम / म्हासुर्ली
दुसऱ्यांच्या जीवनात पाण्याने सुख समृद्धी यावी यासाठी स्वतःचा प्रपंच विस्थापित केलेल्या राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नवीन वसाहतीत तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.परिणामी येथील महिलानां पाण्यासाठी एक किलो मीटरची पायपीट करावी लागत आहे.शिवाय २१ वर्षे झाली तरी ही शासन उदासिनतेमुळे अद्याप धामणी प्रकल्पही पुर्णत्वास गेलेले नाही.
धामणी प्रकल्पासाठी हक्काची जमीन गेल्याने राई सह इतर गावातील शेकडो शेतकरी विस्थापीत झाले आहेत. तर शासनाने उभारलेल्या वसाहतीमध्ये आज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. येथिल विस्थापितांना गट क्र.९९ व ८३ मध्ये अनुक्रमे दोन वसाहतींसाठी घरांना भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.
सदर वसाहतीसाठी रस्ते, वीज व पाण्याची मुबलक सोय केली जाईल,असे प्रशासनातर्फे धरणग्रस्तांना सांगण्यात आले होते.त्यानुसार २०१८/१९ साली मिळालेल्या भूखंडावरती प्रकल्पग्रस्तांनी नवीने घरे बांधली आहेत. यापैकी गट क्र. ८३ मधील विस्थापितांसाठी पाटबंधारे खात्याने गतवर्षी कुपनलीकेची सोय केली.परंतु अवघ्या तीन महिन्यातच ही योजना मृगजळ ठरली व कुपनलीकाच आटली आहे.परिणामी गेल्या सहा महिन्यांपासुन प्रकल्पग्रस्तांना वसाहतीपासुन दुर एक कि.मी.वर असणाऱ्या मांडवकरवाडी येथून पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे.
तर धरणग्रस्त वसाहतीसाठी नदीवरील नळ पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरी अपुरे राहिलेली योजनेची कामे पाटबंधारे विभागाने लवकर पूर्ण करून प्रकल्पपग्रस्तांच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.अन्यथा कार्यकारी अभियंता कोल्हापुर कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन धरणग्रस्तांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे.
सहा महिन्यापासून त्रास..!
आमच्या वसाहतीपासुन एक किमीवर मांडवकरवाडी येथुन भल्या पहाटेपासुन पाणी डोक्यावरून वाहून आणावे लागत आहे. तसेच या ठिकाणी महिलांची गर्दी असते. घागरभर पाण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते. पाणी नसल्याने घरातील कामे लवकर आटोपत येत नाहीत. तर घरातील लहान मुलांना शाळेत वेळेवर पोहचवता येत नाहीत.गेल्या सहा महिन्यांपासुन पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. – रुपाली दगडु कदम, गृहिणी राई प्रकल्पग्रस्त वसाहत.
लवकर योजना पूर्ण करणार…!
वसाहतीसाठी मारलेली कूपनलिकेचे पाणी कमी पडले आहे. तर नदीवरील नळ पाणी योजनेसाठी येत्या चार दिवसात पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच वसाहतीला तात्पुरती पाण्याची सोय व्हावी,यासाठी कंदलगाव येथून पाणी पुरवठा करण्यासाठी चौके ग्रामपंचायत सरपंच यांना पत्र दिले आहे. -एस.एस.पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प क्रमांक-२