वार्ताहर / धामणे
नंदिहळ्ळी, धामणे, देसूर, राजहंसगड, सूळगा (ये.) या भागात रविवारी पहाटे पासूनच सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने या भागातील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन रविवारी पहाटेपासून वादळी वारा व पावसाला जोरदार सुरुवात झाली. मागील चार-पाच दिवसापासून शेतकऱयांनी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली होती. परंतु रविवारी झालेल्या दिवसभराच्या पावसाने आता शेतातील मशागतीची कामे बंद पडल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशारीतीने पाऊस पडत राहिल्यास पेरणी पूर्व मशागतीची कामे कशी पूर्ण होणार याची चिंता शेतकरी वर्गाला लागून राहिली
आहे.
कंग्राळी बुद्रुक परिसरात पाणीच पाणी
परिसरामध्ये रविवारी सकाळपासूनच पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली. यामध्ये वाळलेले गवत आणणाऱया अनेक शेतकऱयांचे ट्रक्टर पावसात अडकल्यामुळे पिंजर भिजून गेले. ट्रक्टर शेतामध्ये अडकल्यामुळे चालकांची तारांबळ उडाली. वादळी वारा आणि पावसामुळे मिरची, कोथिंबीर, कोबी, शेपू आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
वऱहाडकरांची एकच तारांबळ
रविवार दि. 16 रोजी बऱयाच ठिकाणी लग्न सोहळे होते. सध्या कोरोना महामारीमुळे शासनाने केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकून घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे 50 नागरिकांच्या उपस्थितीत सुरू असलेले लग्न सोहळेसुद्धा संततधार पावसामुळे व्यवस्थित पार पडले नसल्यामुळे वऱहाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली.