पीडीओ-अभियंत्यांचा मनमानी कारभार नडला : नियोजनाअभावी बंधारा फोडल्यामुळे शेतकऱयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान : भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर / धामणे
येथील कुंती तलाव भरल्यानंतर सांडपाणी बाहेर जाण्यासाठी चुकीच्या ठिकाणी तलावाचा बंधारा फोडून मोठे 5 फुटी घेरीचे पाईप घालण्याचे काम मागील आठवडय़ात सुरू केले. बंधारा फोडून दोन पाईप या बंधाऱयात घातले. तेवढय़ात पावसाला सुरुवात झाली आणि हे काम अर्धवट पडले. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने हा तलाव दोनच दिवसात भरला आणि पाईप घालण्यासाठी खोदलेल्या ठिकाणी पुन्हा मोठे भगदाड पडून तलावातील सर्व पाणी तलावाच्या शेजारी असलेल्या शिवारात शिरले. त्यामुळे नुकतेच पेरणी केलेले भातपीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्गात संताप पसरला आहे.
या तलावाचे खोदाईचे काम धामणे ग्राम पंचायतीतर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत चार महिने सुरू होते. त्यामुळे या तलावाची खोली बंधाऱयावरून 20 फुटापेक्षा जास्त झाली असल्याने या तलावात पाणी जास्त प्रमाणात साचते. म्हणून पीडीओ वीणा हडपद आणि इंजिनिअर यांनी तलावाशेजारील शेतकऱयांना किंवा ग्राम पंचायत सदस्यांना विचारात न घेता बंधारा फोडून पाईप घालण्याचा मनमानी कारभार केल्याने येथील शेतकऱयांच्या भातपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवारात तलावाचे पाणी मोठय़ा प्रमाणात शिरल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आता झालेले मोठे नुकसान पीडीओ आणि इंजिनिअर देणार का? असा प्रश्न शेतकऱयांकडून केला जात आहे.
याच तलावासाठी ग्राम पंचायतच्यावतीने रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले असून तलावाची खोदाई मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. गेले चार-पाच दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने हा तलाव भरला आणि चुकीच्या ठिकाणी बंधाऱयाची खोदाई केल्याने तलावासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला असून शेतकऱयांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.