नागरिकांचा सवाल : कार्यालयात अनावश्यक साहित्याचा साठा
वार्ताहर /धामणे
धामणे गावातील तलाठी ऑफीस की ग्राम पंचायतचे गोडाऊन? असा प्रश्न येथील नागरिकांना लागून राहिला असून याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तलाठी ऑफीस म्हणजे ग्रामीण भागात महत्त्वाचे मानले जाते. शेतकऱयांच्या अडचणी तलाठीच्या मार्फत सोडविल्या जातात. धामणे गावातील तलाठी ऑफीस हे धामणे ग्राम पंचायत इमारतीमध्ये आहे. त्यामध्ये धामणे, कुरबरहट्टी, काळम्मानगर, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी या गावातील शेतीसंबंधी कागदपत्रे व इतर कामांसाठी शेतकऱयांना शासनाकडून आलेल्या सुविधांची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱयांची व इतर नागरिकांची या तलाठी कार्यालयात जास्त वर्दळ असते.
ग्राम पंचायतीने नको असलेले साहित्य या तलाठी ऑफीसमध्ये भरून ठेवल्याने येथे येणाऱया नागरिकांना तलाठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी त्रासाचे ठरत आहे. ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तलाठी ऑफीसमध्ये ठेवण्यात आलेले हे बिनकामाचे साहित्य धामणे ग्राम पंचायतने तातडीने काढावे तसेच येणाऱया नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी धामणे, कुरबरहट्टी काळम्मानगर, मासगौंडहट्टी. देवगणहट्टी येथील नागरिकांतून होत आहे.