वार्ताहर/ धामणे
धामणे येथील शेतातील भाताच्या गंजीला अज्ञातांकडून आग लावण्यात आल्याने दोन्ही गंज्या आगीत भस्म झाल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवार दि. 15 रोजी संध्याकाळी 7.30 सुमारास घडली आहे.
दिवाळीच्या सणाची लगबग सुरु असतानाच रविवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास येथील बसवाण गल्लीच्या पूर्वेकडे गल्लीतून हाकेच्या अंतरावर असलेले परमारसिंग भिमसिंग जमादार यांची दोन एकर आठ गुंठे व अब्दुल किल्लेदार यांची एक एकर तीन गुंठे शेती मनोहर जोतिबा बाळेकुंद्री हे शेतकरी वार्षिक खंडाने करत आहेत. मनोहर यांनी चार दिवसांपूर्वी या शेतातील भात पिक कापून येथेच दोन मोठय़ा गंज्यामध्ये अंतर ठेवून घातल्या होत्या. परंतु रविवारी सायंकाळी 7.30 वाजता येथून काही अंतरावर असलेल्या रहिवाशांना आपल्या घरच्या खिडकीतून आगीचा भडका उडत असल्याचे दिसले व त्यानीच आरडा ओरडा केल्याने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. परंतु या भाताच्या दोन्ही गंजीनी मोठा पेट घेतला होता. अग्नीशामक दल एक तासानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत भात पिकाच्या दोन्ही गंज्या आगीच्या भस्मस्थानी पडल्या होत्या.
यंदा मनोहर बाळेकुंद्री या शेतकऱयाने या शेतात बासमती भाताची पेरणी केली होती. हे भात पिक यंदा उत्तम आले होते. परंतु हाता तोंडाला आलेले पिक अज्ञातांकडून ही घटना घडून भात पिकाच्या गंजी आगीच्या भस्मस्थानी पडल्याने या शेतकऱयाचे 50 ते 55 पोती बासमती होणाऱया भाताची किंमत 1 लाख्घ् 60 हजार रुपये आणि गवत असे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेने येथील शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.