लॉकडाऊनच्या काळात अज्ञाताकडून कृत्य : पर्यावरणप्रेमी ऍड. केणी यांनी वेधले लक्ष
प्रतिनिधी / मालवण:
राज्यात लॉकडाऊन असूनही धामापूर तलावामध्ये चिरे, माती टाकून शासनाच्या आदेशाचे दहाव्यांदा उल्लंघन करण्यात आले आहे. तलावाच्या हायफ्लड लाईनमध्ये बेकायदेशीरपणे अज्ञाताने चिरे आणि माती टाकली आहे. त्यामुळे तहसीलदार व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. धामापूर तलाव हे गावातील जुन्या लोकांच्या विवेकबुद्धीचे प्रतीक आहे. धामापूर तलाव व सडा हे गावची लाईफलाईनच आहेत, असे पर्यावरणप्रेमी ऍड. ओमकार केणी यांनी म्हटले आहे. याबाबत ऍड. केणी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ऍड. केणी म्हणतात, धामापूर तलावामध्ये पिढय़ान्पिढय़ा लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. जुन्या लोकांनी तलावाजवळ कोणतेही बांधकाम केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार कान्होजी आंग्रे यांनी तलाव परिसरात वन संवर्धित केले. धामापूर तलाव हा सुमारे 65 हेक्टर क्षेत्रात व्यापलेला आहे. या तलावाची गोडे पाणी धारण करण्याची क्षमता आहे. तलावात किंवा तलावाच्या काठावर जर माझी जमीन आहे, असे म्हणून मी काहीही करेन तर ते तलावाच्या स्वास्थ्यासाठी योग्य ठरणार नाही. देशातील 100 तलाव/धरण पाणथळ जागांचे आरोग्य कार्ड बनविले गेले होते. या 100 पाणथळ जागांमध्ये धामापूर तलावाची निवड होऊन तलावाला सी प्लस ग्रेड मिळाली होती.
धामापूर तलावामध्ये व परिसरात वन विभाग तसेच लोकांच्या जमिनी आहेत. पण काही लोकांकडून अजाणतेपणी गेल्या काही वर्षांत इथे भराव टाकणे, चिरे-काँक्रिटचे बांधकाम करणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे तलावाचे स्वास्थ्य बिघडणार आहे. तलावाची पाणी धारण करण्याची क्षमता कमी होणार आहे. असे जर सर्वांनीच केले, तर या तलावाची पातळी खालावत जाईल आणि भविष्यात एक दिवस हे तलाव संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या पाणथळ जागा इस्रोने बनविलेल्या ऍटलासमध्ये नमूद आहेत, त्या संरक्षित आहेत. इथे कोणतेही उल्लंघन केलेले चालणार नाही. धामापूर तलावाची नोंद या ऍटलासमध्ये आहे व तलावाचे दस्तावेजीकरण जिल्हाधिकाऱयांनी मंजूर करून मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर समिती स्थापन केली आहे. याचे अध्यक्ष कोकण विभाग आयुक्त आहेत. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाची तक्रार (बेनामी तक्रारही) तहसीलदारांनी स्वतः जागेवर जाऊन पंचनामा करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करायची आहे. पोलिसांनाही तसे आदेश दिले गेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रार नोंद करण्यासाठी वेबसाईटही सुरू केली आहे. http://konkanwetland.com/ या वेबसाईटवर तलावावर कोणतेही उल्लंघन आढळल्यास ऑनलाईन तक्रार नोंद करू शकता. ही तक्रार थेट कोकण विभाग आयुक्त आणि सदस्यांकडे नोंद होते, असेही केणी यांनी म्हटले आहे.