शेतकऱ्यांतून तीव्र संताप
धामोड / वार्ताहर
धामोड (ता. राधानगरी) परिसरातील विद्युत कनेक्शन शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देताच तोडल्याने मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.
विद्युत वितरण कंपनीचे शिरगांव सब डिव्हिजन अंतर्गत धामोड येथे कार्यालय आहे. शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीची गतसालची बिले अदा केलेली आहेत. चालूवर्षी बहुतांशी शेतकऱ्यांची ऊस पिके अद्याप शेतात उभी आहेत. कारखान्यांना ऊस न गेल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहे. उन्हाळ्याचे दिवस असून उभ्या ऊस पिकांना तसेच गेलेल्या ऊस पिकांना पाण्याची गरज आहे. अशातच विद्युत बिलापोटी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता जवळपास दिडशे कनेक्शने तोडली. त्यांच्या या मनमानी कारभाराविरूध्द तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान विभागाचे आमदार प्रकाश आबिटकर हे धामोड येथे आले असता संतप्त शेतकर्यांनी महावितरण विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. शेती पंप वापराची बिले मीटर रीडिंगव्दारे दिले जाते. प्रत्यक्ष जागेवर न जाताच रिडींग दाखविले आहे. कोरोना लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिल ग्राहकांना देण्यात आली आहेत. बील हे अवास्तव प्रमाणात देण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे न वापरलेल्या विजेचेही बील आले असून मागिल रिडींग उपलब्ध नाही असे महावितरण कंपनीकडून सांगितले जाते. पावसाळ्यात विद्युतपंप बंद असुनही बिले आकारली आहेत. तसेच बिलावर व्याज व दंड आकारणी करुन बोगस रिडींगद्वारे बिले पाठवली जातात हे अन्यायकारक असुन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देयके भरणार नाही असा पवित्रा पंप धारकांनी घेतला आहे. शिरगावचे शाखाअभियंता भोसले यांना आमदार आबिटकर यांचेमार्फत धामोड येथे बैठकीस उपस्थित राहण्याची सुचना देवुनही ते अनुपस्थित राहिले. आमदार आबिटकर यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना दुरध्वनीवरुन संपर्क करुन सोमवारी शासकीय विश्रामगृह कोल्हापुर येथे सायंकाळी पाच वाजता याबाबत स्वतः व शेतकर्यांसह बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महापुरात शेतकऱ्यांच्या विदयुत पेट्या, मीटर वाहून गेली. वितरण कंपनीने मीटर देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्जही मागविले मात्र अद्यापही कार्यवाही नाही. मीटरशिवाय बिले देण्याचे अनागोंदी काम कंपनी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून आपल्या कर्तव्याचा विसर कंपनीला पडल्याचे शेतकऱ्यांनी तिखट शब्दात सांगितले