वाद सोडविण्यास गेलेल्याचाच बळी
धामोड/ प्रतिनिधी
धामोड (ता. राधानगरी) येथील वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाचाच धारदार शस्त्राने खून करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मयत तरुणाचे नाव अनिल रामचंद्र बारड ( रा. धामोड, वय -४७ ) असे असून हि घटना कुंभारवाडी फाटा येथे घडली . चुना देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान खूनात झाले. मारेकरी विकास नाथाजी कुंभार (रा. केळोशी बु॥पैकी कुंभारवाडी) यास राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद प्रथमेश अनिल बारड यांनी राधानगरी पोलिसांत दिली आहे .
याबाबत राधानगरी पोलिस व घटनास्थळावरून समजलेली अधिक माहीती अशी की, शुक्रवारी रात्री बुरंबाळी येथील निसर्ग हॉटेलमध्ये मयत अनिल बारड यांचा भाचा जितेंद्र केरबा खामकर ( रा. खामकरवाडी ) व आरोपी विकास नाथाजी कुंभार ( रा. केळोशी बु॥पैकी कुंभारवाडी ) यांचा तंबाखूला चुना देण्या-घेण्यावरून वाद झाला. आरोपी विकास कुंभार याने जितेंद्र खामकर यास शिवीगाळ करून मारहान केली व पुंन्हा मारणेची धमकी दिली . धमकी दिलेची माहीती जितेंद्र याने त्याचा मामा अनिल बारड यास दिली. जितेंद्र व विकास या दोघांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने जवळ असणाऱ्या धारदार चाकूने अनिल यांच्यावर वार केले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुंभारवाडी फाटा येथे घडली. या घटनेत अनिल यांचा मृत्यू झाला. सिपीआर येथे शवविच्छेदन केल्यानंतर शनिवार ११ वाजता पोलिसबंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल बारड हे गोकूळ शिरगांव येथील शेतकरी संघात शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई असा परिवार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलिसांनी धामोड- कुंभारवाडी येथे चोख बंदोबस्त ठेवला असून अधिक तपास राधानगरी पोलिस करीत आहेत .