तीन म्हैशी भाजुन गंभीर जखमी, शेतीपयोगी साहित्य, धान्य जळून खाक
धामोड / वार्ताहर
धामोड ( ता. राधानगरी ) येथील शेतकरी किरण व सुरेश महिपती टेपुगडे यांच्या शेतातील गोठ्यास शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली . तीन म्हैशी जखमी होऊन गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत दोन्ही शेतकर्यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, किरण व सुरेश टेपूगडे या दोन भावांचा ‘ टेपूगडे दरा ‘ नावाच्या शेतात जनावरांचा गोठा आहे. जनावरांना माशी व डासांपासुन संरक्षण करणेसाठी गोठ्यात धुरांडी केली होती. त्यातील निखारा वार्याने पसरुन गोठ्यातील लाकडी साहित्यांनी पेट घेतला. दुपारची वेळ असल्यामुळे व घटनास्थळ गावापासुन दुर असलेने ही बाब गावकर्यांच्या लक्षात आली नाही. आग पसरत असताना येथे जवळच असलेल्या आनंदी पाटील या महिलेला या शेतकर्यांच्या शेतामधुन व गोठ्यातुन मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याचे दिसले. तिने आरडाओरड करुन पाचशे फुट दुर असलेल्या अरुण धनवडे या युवकाला बोलविले. त्याने प्रसंगावधान दाखवुन जनावरांचे दोर कापले व मुक्त केले. यात ३० ते ४०% जनावरे भाजली आहेत. ही घटना लक्षात येताच शेतकरी व मालक शेतात धावले. यावेळी जमेल तसे पाणी मारुन अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यत शेतकरी टेपुगडे यांच्या गोठ्यातील धान्याची व खताची पोती, फवारणी औषधे, पत्रे, शेती अवजारे आदी शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेमुळे त्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .