प्रतिनिधी/ बेळगाव
जुना धारवाड उड्डाणपुलाखालील रस्ता नेहमीच वाहनचालकांसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. या रस्त्यावरील काँक्रीट खराब झाले असून आतील सळय़ा वर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी या सळय़ा निदर्शनास न आल्याने थेट वाहनांमध्ये अडकत आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. परंतु या समस्येकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही. एखाद्या निरपराध्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उड्डाणपुलाची खालील बाजू मद्यपींसाठी अड्डा बनला आहे. दारू पिऊन याच ठिकाणी बाटल्या फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे या परिसरातून जाणे- येणेही कठीण होत आहे. कचराही मोठय़ा प्रमाणात साचला असून त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. ब्रिजखालील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वरचे काँक्रीट खराब झाले असून सळय़ा वर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी सळी कारच्या आतील भागात अडकली. दुचाकींमध्येही अशाच प्रकारे या सळय़ा अडकत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे काँक्रीट टाकून त्या बुजविणे गरजेचे आहे.