अखेर धारावीने संपूर्ण देशाला दिलासा दिला आहे. जिथे सरासरी रोज 47 रूग्ण नव्याने वाढायचे तो आकडा 18 पर्यंत खाली आला आहे. रूग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या महिन्यात 43 दिवसांचा होता तो आता 78 वर गेला आहे. भारत सरकारने यासाठी मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. प्राण हातात घेऊन झटलेली मुंबई महापालिकेची यंत्रणा, आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस यांच्याबरोबरच धारावीतील सर्वसामान्य नागरिकांचे या यशाबद्दल कौतुक केलेच पाहिजे. ज्या धारावीत एकमेकाला खेटल्याशिवाय माणसांना पुढे जाता येत नाही त्या धारावीत सोशल डिस्टन्सिंग पाळायचे तरी कसे असा प्रश्न होता. शौचालयांची संख्याही जिथे अत्यल्प आहे तिथे परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्य आहे असे म्हटले जात होते. पण, अशक्य ते शक्य करून दाखविण्यात यंत्रणेला यश आले आहे. मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त चहल, अधिकारी दिघावकर, सर्व डॉक्टर, टास्क फोर्स, पोलीस आयुक्तांपासून ते सर्वसामान्य पोलिस, सर्वपक्षीय-सामाजिक संघटनांपर्यंत प्रत्येकाचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खासगी दवाखान्यांच्या डॉक्टरांपासून सफाई करणाऱया, सॅनिटायझेशन करणाऱया कर्मचाऱयांपर्यंत प्रत्येकाने जीव धोक्यात घालून धारावीला वाचवले आहे. भारतात जितक्या जात, धर्म आणि वंशाचे लोक राहतात तेवढय़ा सगळय़ांचे प्रतिनिधी धारावीत राहतात. त्यामुळे धारावीत काय घडते याकडे संपूर्ण भारताचे लक्ष आहे. तिथे महामारी आटोक्यात येत असेल तर आसपासच्या नवी मुंबई, कल्याण, डेंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडीपासून ते पुणे, सोलापूरपर्यंतच्या प्रत्येक शहरातील महामारी आटोक्यात येऊ शकते असे आशादायी वातावरण यामुळे निर्माण झालेले आहे. वेगवान तपासण्या आणि तितकेच वेगवान उपचार, संशय वाटतोय मात्र अद्याप रिपोर्ट आलेला नाही अशा व्यक्तीवरही उपचारास प्रारंभ, दवाखाने कमी पडत असतील तर खासगी डॉक्टर आणि दवाखान्यांची मदत घेऊन उपचार करण्यास प्राधान्य या सर्वच बाबींचे कौतुक झाले पाहिजे. महापालिकेने स्वतःच्या अधिकारात खरेदी केलेले पीपीइ किट, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये यासाठीचे प्रयत्न आणि ते कमी पडले तरी कामात हयगय न करणारे लोक या सर्वांनी देशासमोरच एक आदर्श ठेवला आहे. इतक्या मोठय़ा संकटाला सामोरे जात असताना चुका या होतच असतात. मात्र त्यांचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. इटलीसारख्या देशातही लोकांवर उपचार होऊ शकले नाहीत. लोकांची परवड झाली. अनेकांना जीव गमवावे लागले हे संपूर्ण जगात घडत असताना महाराष्ट्र त्याला अपवाद ठरेल असे कसे होईल? मात्र महाराष्ट्रातही ज्या धारावीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या, त्यांनी पूर्वीच्यापेक्षा खूप मोठा पल्ला गाठला आणि गंभीर परिस्थितीवर मात केली हे अभिमानास्पद आहे. अर्थात अद्याप धारावीत कोरोना पूर्णतः नष्ट झाला असे झालेले नाही. जगात ज्या देशांना आपण त्यातून मुक्त झालो असे वाटत होते तिथे पुन्हा लाट निर्माण झाली असेही घडले आहे. त्यामुळे धारावीतील यंत्रणा या यशाने हुरळून न जाता आपले मार्गक्रमण करतच राहील अशी आशा बाळगूया. शेवटी चुका या काम करणाऱयांकडून होत असतात. केवळ चर्चा झाडणाऱयांचे विद्यापीठ परीक्षा मंडळ होते! आजच सीबीएसइ बोर्डाच्या वतीने भारताच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडले आणि या परीक्षा रद्द झाल्याचे स्पष्ट झाले. दहावीप्रमाणेच बारावीच्याही परीक्षा होणार नाहीत. याला कारण दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांनी असमर्थता दर्शवली असे सांगितले जात असले तरी समर्थपणे आम्ही या परीक्षा घेऊन दाखवू असे सांगणारे कुठले राज्य पुढे आले होते हे मात्र सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे कर्नाटकसारख्या राज्याने धाडसी निर्णय घेऊन आपल्या राज्य मंडळाच्या बोर्डाच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ केला आहे आणि या परीक्षा किती आदर्शपणे घेता येऊ शकतात याचे काही मॉडेलही समोर आणले आहेत. हेच काम देशातील एकाही कुलगुरूंनी करून दाखवलेले नाही. विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट बजावण्याचे धाडस एकाही कुलगुरूंनी दाखवलेले नाही. केवळ विद्यापीठ कायद्याची ढाल करण्याचे विद्वतकार्य करून त्यांनी आपली जबाबदारी ढकलून दिली. परिणामी महाराष्ट्रासारख्या राज्याने स्वतःच्या अधिकारात राज्यपालांनाही बाजूला सारून परीक्षा रद्द केल्या. तीन सेमिस्टरच्या गुणांवर आधारित अंतिम वर्षाचे गुणदान करण्याचे आणि ज्यांना परीक्षा द्यायचीच आहे त्यांच्यासाठी कोरोना संकटानंतर परीक्षेची व्यवस्था करण्याचे धोरण जाहीर केले. सीबीएसई बोर्डाच्या आडून केंद्र सरकारनेसुद्धा हेच धोरण स्वीकारले आहे. मग ज्या पक्षाचे केंद्रात सरकार आहे त्या पक्षाच्या विद्यार्थी शाखेने विद्यापीठ परीक्षा झाल्याच पाहिजेत अशी भूमिका घेतली त्यांना त्यांच्याच सरकारने तोंडावर पाडले आहे. कोरोनाच्या संकटातील प्रत्येक बाबीत एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येत आहे ती म्हणजे, बऱयाच बाबतीत धाडसाने पुढे येऊन निर्णय घेतल्याशिवाय परिस्थितीवर मात करता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना केवळ अजोय मेहता यांच्याशी असलेल्या वादामुळे हटवले गेले असे म्हणणे त्यावेळी योग्य असेल. पण, लातूरच्या भूकंपात उत्तम कामगिरी करणारे परदेशी आणि कोरोनात उत्तम कामगिरी करणारे चहल यांच्यातील कर्तबगारीला प्राधान्य आणि महत्त्व देणे गरजेचे आहे. व्यक्ती महात्म्य जपण्याची ही वेळ नाही. याचा विचार आता देशभरातील यंत्रणेने करण्याची गरज आहे. तरच कोरोनाच्या विविधांगी संकटांवर मात करता येईल. धारावीचा तरी हाच संदेश आहे.
Previous Articleशेअर बाजारात सलग दुसऱया दिवशी घसरण
Next Article खानापूर तालुक्मयात दहावीचा पहिला पेपर सुरळीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.