नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अल्पसंख्याकांनी तृणमूल काँगेसला एकगठ्ठा मतदान करावे, असे आवाहन तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लीमांना केले आहे. हे त्यांचे आव्हान आता त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना यासंबंधी नोटीस पाठविली असून 48 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे. आयोगाकडून ही माहिती देण्यात आली.
बॅनर्जी यांचे हे विधान आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने बॅनर्जींच्या या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांना नोटीस पाठविली आहे.
या विधानाचे स्पष्टीकरण योग्यरित्या न दिल्यास बॅनर्जीं यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करू शकतो. त्यांच्या प्रचार करण्यावर निर्बंध घालण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अद्याप पाच टप्पे उरलेले आहेत. ममता बॅनर्जी या तृणमूलच्या एकमेव मुख्य प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारापासून रोखल्यास तृणमूलची कोंडी होऊ शकते. मतदारांना धर्माच्या किंवा जातींच्या नावावर आकर्षित करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणती पावले उचलणार याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे.