चित्रा फडते यांचा स्तुत्य प्रयत्न
जगन्नाथ मुळवी /मडकई
धालो ही लोककला गोव्याची अस्मीता व परंपरा आहे. कालौघात ती टिकून राहावी. युवा पिढीला धालोगीते पाठ व्हावीत, यासाठी समाजसेविका व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चित्रा फडते यांनी गावोगावी धालोत्सवाच्या मांडावर खेळल्या जाणाऱया धालोगीतांचे संकलीत करून ’गांवकवन’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
बंदर-बांदोडा येथील चित्रा फडते यांनी धालो मांडावर धालो खेळणाऱया जाणकार महिलांकडून धालोगीते शिकून घेतली व नंतर त्यांचे संकलन केले. ठराविक क्रमानुसार संकलीत केलेल्या धालोगीतांवर आधारीत ‘गांवकवन’ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशिक झाले आहे. धालोगीतांमध्ये शब्दांची ताकद दिसून येते. ज्यांनी ही गीते रचली त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जुन्या पिढीतील लोकांनी ज्या कल्पकतेने या धालोमांडाची निर्मीती केली, त्यांचा हा ठेवा व वारसा टिकवून ठेवतानाच पुढील पिढीपर्यंत नेणे गरजेचे आहे. धालोत्सवातील या लोकगीतांमध्ये दैवीक शक्ती वास करते, त्याचा प्रत्यय धोलोमांडाच्या शेवटच्या दिवशी देवरंभाच्या अवसरातून दिसून येत असतो. गावागावात धालोमांडाचे पावित्र्य पूर्वी जपले जात होते. गावातील रंभाकडे भक्त काही समस्या मांडीत होते. मात्र मध्यंतरीच्या पिढीने सुशिक्षीतपणाचा आव आणून या परंपरेकडे पाठ फिरविली.
गोव्याच्या ग्रामीण भागात धालोमांड बंद पडत चालले आहेत. हे चित्र बदलायला हवे म्हणून चित्रा फडते यांनी अथक परिश्रम करून ‘गांवकवन’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मंत्रामध्ये जशी ताकद असते तसेच शब्दांचे सामर्थ्य धालोगीतांतून दिसून येते. स्त्रीयांनी एकत्रित गायिलेल्या या गीतांतून स्वर्गांतील रंभांना त्या खाली पृथ्वीवर बोलावत म्हणतात,
“बत्तीस पाऊणे तैहतीस स्वर्गे उतरूनी आली देव रंभा गे…!
आम्ही देवाच्यो देव रंभा गे, आम्ही आगंणी उभी रावल्या गे…!
रावल्या झाल्यार बरे हो झालें सखीया साद घाला गे..!
ओळी लावून घेया गे…! ओळी बाये ओळी गे हळदीचे ओळी गे..,!’’
अशी गिते गात पंचक्रोशीत असलेल्या देवदेवतांसाठी व माणांच्या गुरूसाठी ती सोन्याचे कळस बांधून देऊळ उभारतात. त्यांना गंध फुले वाहून त्यांची पूजा गितातून करतात. फुगडय़ा घालणे, पिगंळी खेळणे, रानात जावून सावज मिळणार का म्हणून घाडीकडे विचारणा करणे. सावज मिळाल्यानंतर त्याचा वाटा घालणे. शेवटी रंभाच्या अवसराने या धालोत्सवाची सांगता होते. अशी रसभरीत गिते गाऊन लोककला जपणारी ही परंपरा टिकली पाहिजे म्हणून चित्रा फडते यांनी पुस्तकरुपाने केलेला हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
चित्रा फडते यांच्या घराण्यात कलेचा वारसा असल्याने त्यांना हे शक्य झाल्याचे सांगतात. दिग्गज नाटय़कलाकार पांडुरंग उर्फ बाप्पा फडते हे चित्राचे सासरे होते. त्यामुळे घरात कला नादंत होती. संस्कृती व परंपरा टिकावी म्हणून आपल्या सासऱयांचे प्रयत्न असायचे. त्यामुळे हे पुस्तक सासू-सासऱयांना समर्पित केल्याचे त्या सांगतात. या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. अनिता तिळवे यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी फोंडा महिला गटाध्यक्ष मोहिनी नाईक, नाटय़ कलाकार तुळशिदास धोणशीकर, अर्चना फडते आदी मान्यवर उपस्थीत होते. या पुस्तकाला प्रस्तावना निळकंठ फडते यांची तर प्रोत्साहना ‘दै. तरुण भारत’चे पत्रकार जगन्नाथ मुळवी यांनी दिली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ दुर्वा प्रसाद वळवईकर यांनी केले आहे.