वार्ताहर / कास :
मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच महाबळेश्वर तालुक्यातील धावली गावामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरुच असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धावली गावाच्या वरच्या बाजूला सुमारे 500 फूट उंच डोंगरकडा आहे आणि त्याच्यावर तीव्र उतार असलेला जवळपास 250 फूट उंच डोंगरकडा आहे. या दोन्ही डोंगरकडयाच्या मधल्या भागात भूस्खलन होत आहे. ज्यामुळे प्रचंड प्रमाणावर दरड आणि माती खाली वसलेल्या धावली गावाच्या वरच्या बाजूने कोसळत आहे.
दोन्ही डोंगरकडाच्या मधल्या भागात भूस्खलन होत असल्यामुळे वरच्या डोंगरकडाच्या खालील दगड मातीचा भराव कमी होत आहे, त्यामुळे वरील डोंगरकडा कधीही निसटून धावली गावावर कोसळू शकतो. 500 फूट उंच डोंगरकडा व त्यावरील 250 फूट उंच डोंगरकडा धावली गावासाठी अत्यंत धोकादायक झालेले आहेत, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरकड्यावर वरच्या धारेला 30 ते 40 फूट लांबी / रुंदी / उंची असणारे दगड, आधीपासूनच धोकादायक स्थितीत आहेत, ते कोणत्याही क्षणी खाली कोसळून खालील 60-70 घरे उध्वस्त होण्याची संभाव्य भीती गावकऱ्यांमध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आहे. या सर्व घटनामुळे माळीण सारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रचंड पावसामुळे रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत, त्यामुळे गावाचा संपर्क भिलार, पांचगणी तसेच मेढा बरोबर तुटलेला आहे.
मुसळधार पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे असून, गावकरी भीतीचे छायेखाली राहत आहेत.मुसळधार पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मध्यरात्री पासून सुरवात केली. मात्र, तरीही मोठ्या प्रामाणात पाणी वाढल्याने व दरड कोसळणे चालूच असल्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. पण काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने या गावाची अवस्था बिकट होऊन गेलीय.