मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात रेडय़ांच्या झुंजीचा प्रकार वाढला असून कायद्याने बंदी असूनही धिरयो चालू आहेत, त्या तात्काळ बंद झाल्या पाहिजेत. त्यासाठी पोलिसांनी योग्य ते नियोजन करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना दिला आहे.
गोव्यात अधिकतर रेडय़ांच्या झुंजी चालतात. दक्षिण गोव्यात अधिकतर रेडे पाळलेले दिसतात. रेडे पाळणे हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र पहाटे पाच वाजता प्रत्येक रविवारी गावागावात धिरयो चालतात. त्यात लाखोंचा सट्टा होतो. या धिरयोचे प्रत्यक्ष प्रसारण विदेशातील गोमंतकीयांपर्यंत पोचवले जाते. ऑनलाईन सट्टेबाजी चालते. पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार घडूच शकत नाही, अशी तक्रार हय़ुमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेने केली होती.
धिरयोमुळे रेडा जखमी झाला, रेडा मेला अशा बातम्या प्रसारित होत होत्या. आता रेडय़ाचा मालक जखमी झाला. त्याच्यावर खासगी इस्तितळात उपचार सुरू आहेत. खासगी इस्पितळही पोलीस तक्रार नोंदवण्याची सूचना करीत नाही व पोलीसही दखल घेत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धिरयोंचे रॅकेट मोडून काढले गेले पाहिजे. त्यासाठी आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली, किती गुन्हे नोंद झाले, किती जणांना दोषी ठरवून शिक्षा झाली. त्याचा तपशील न्यायालयासमोर सादर करा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.