प्रतिनिधी / सातारा :
धुक्यात हरवली वाट…सोबतीला वळणावळणाचा घाट..उरतुनी आले धुके काय…वर्णावा तो सह्याद्रीचा थाट…अशा शब्दात वर्णन करावे तेवढे थोडेच. सकाळी जिल्ह्यात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत असेच वातावरण होते. या वातावरणाचा काहींनी मनमुराद आनंद घेतला तर याच वातावरणाचा पिकांना धोका निर्माण होणार असून, किडीचा प्रार्दुभाव सुरु होणार आहे. अजून चार दिवस असेच वातावरण राहिल असा अंदाज हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. सकाळच्या धुक्यामध्ये क्षणभर आपण काश्मिरमध्येच आहोत, असा भास सातारकरांना झाला.
दरवर्षी धुके हे पावसाळय़ात डोंगरमाथ्यावर विशेष करुन महाबळेश्वर, तापोळा परिसरात अनुभवायला मिळते. तर दाट धुक्यात पहुडलेली गावे, शहरे हे चित्र जम्मू काश्मिर, दिल्ली या भागात हिवाळय़ात पहायला मिळते. परंतु शनिवारी सकाळीच जिल्ह्यात वातावरण बदलले. धुक्यात रस्ते हरवले होते. सातारा शहरात तर मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना अनोखा फिल पहायला मिळाला. कुरणेश्वर, चार भिंती, अजिंक्यताऱ्यावर आणि यवतेश्वर घाटात चालणाऱ्यांना पुढचे काहीच दिसत नसल्याने ते तेथेच काही काळ थांबून राहिले. आता धुके उतरले मग कमी होईल म्हणत कुडकुडत्या थंडीतून रस्ता काढत घर गाठले. महामार्गावरही धुक्यामुळे वाहतुक धिम्यागतीने सुरु होती. धुक्याची तीव्रता सव्वा दहा वाजेपर्यंत जाणवत होती. दवांचे थेंब धुक्यासोबत पडत थंडीची जाणीव करुन देत होते. त्यामुळे क्षणभर साताऱ्यात नव्हे तर काश्मिरमध्येच आहोत असा फिल वाटत हेता.
हवामान तज्ञांकडून आणखी चार दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज
उत्तर भारत, काश्मिर या भागातून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव हा आहे. तिकडे सगळे वारे बाष्प घेवून इकडे पोहचतात. सकाळच्या धुक्यात हवेत अंत्यत सुक्ष्म पाण्याचे थेंब असतात. ते हवेत लटकत राहतात. तो कालावधी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यत असतो. ज्या वेळी हवेत आर्दता ज्यास्त असते. याचा पाऊसही होणार असून तो विदर्भात पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस होणार नाही. परंतु धुके रहाणार आहे. सातारा जिल्ह्यात कांदा पीक ज्यांचे असेल त्यांनी काळजी घेतली पाहिजे. औषधफवारणी करावी लागेल. आले, लसुण, हळदीवर तांबेरा वाढण्याची शक्यता आहे. हवेत सुक्ष्म पाण्याचे कण धुक्यात असल्याने काही जंतूची वाढ मोठया प्रमाणात होते. त्यामुळे भेंडी पिकालाही प्रार्दुभाव होतो. टोमॅटोवर रोग पडू शकतो. असेच वातावरण अजून पाच ते सहा दिवस राहणार आहे, असे हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.