पांढरा समुद्र ते मिऱया सागरी धूपप्रतिबंधक बंधारा समितीचा निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
नजीकच्या पांढरा समुद्र ते मिऱया येथे समुद्राचे आक्रमण थोपवण्यासाठी मिऱया ग्रामस्थांची कित्येक वर्षांची मजबुत धूपप्रतिबंधक बंधाऱयाची मागणी आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र या मागणीला अद्याप यश आलेले नाही. अखेर 26 जानेवारी रोजी पांढरा समुद्र ते मिऱया येथील सर्व ग्रामस्थांनी आक्रमक होत या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 3 कि.मी.ची मानवी साखळी उभारणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबतचे निवेदन पांढरा समुद्र ते मिऱया सागरी धूपप्रतिबंधक बंधारा समिती, रत्नागिरीतर्फे जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी, शहर पोलीस ठाणे, पतन अभियंता मांडवी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे. गतसाली 26 जानेवारी रोजी पांढरा समुद्र ते मिऱया परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची दखल तत्कालीन पालकमंत्री यांनी घेऊन मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेतल्या. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या उपोषणकर्त्यांना ‘मातोश्री’वर बोलावून घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या उपोषणकर्त्यांची शिष्टाई करत मोलाचे सहकार्य केले व 3.5 कि.मी. च्या सागरी धूपप्रतिबंधक बंधाऱयासाठी शासकीय मान्यता मिळवून दिली. परंतु त्या बाबत संबंधित खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी दखल न घेता अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
गेल्या मान्सूनमध्ये आणि झालेल्या अनेक वादळांमुळे किनाऱयावर असलेला बंधारा पूर्णपणे तुटून गेला आहे. येणाऱया मान्सूनमध्ये वादळी वारे व पावसाचा जोर झाल्यास मानवीवस्तीत समुद्राचे उधाणाचे पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. संथगतीने चाललेले काम, गांभीर्याने विचार न झाल्यामुळे अखेर पांढरा समुद्र ते मिऱया येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी येत्या 26 जानेवारी रोजी 3. कि.मी.ची मानवी साखळी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. यावेळी मिऱया येथील ग्रामस्थ आप्पा वांदरकर, दिनेश रामकृष्ण सावंत, जयेंद्र दत्ताराम नार्वेकर, प्रमोद प्रभाकर नार्वेकर, दिंगंबर बालकृष्ण किर, दीपक लहू पाटील, तनया तुषार शिवलकर, दीपा दीपक मुरकर, स्वप्नील अनंत शिवलकर, ययाती रवींद्र शिवलकर, चंद्रशेखर अनंत पाटील, आदेश शशिकांत भाटकर, बाळकृष्ण शंकर शिवलकर, विलास बाळकृष्ण सावंत, शंकर सुदाम नागवेकर, चंद्रकांत अप्पा मयेकर, अंकुश भाऊ शिवलकर, मनोहर लक्ष्मण भुवड यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.