प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात येत्या 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने जिल्हय़ातील नदीकाठी राहणाऱया तसेच धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असणाऱया नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे होणारे नागरिकांचे संभाव्य नुकसान टळून मोठय़ा आपत्तीला समोर जावे लागणार नाही.
चिपळुणात निवारा केंद्रात स्थलांतरित करणार
चिपळूणः नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने चिपळूण शहरासह नदीकाठच्या सुमारे चार गावांतील 1 हजार 608 नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरीत केले जाणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार ढगफुटीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. यामध्ये एकूण 4 ठिकाणच्या 78 हजार लोकसंख्येमध्ये 7 हजार 237 घरे पूररेषेत आहेत. एकूण बाधित कुटुंबे 1 हजार 488 असून एकूण लोकसंख्या 3 हजार 625 आहे. त्यामधील 1 हजार 608 जणांची निवारा केंद्रात व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये खेर्डीतील 298 जणांना मेरी माता हायस्कूल, शिगवणवाडी व मोहल्ला, दातेवाडी, देऊळवाडी, कातळवाडी येथील शाळांत स्थलांतरित केले जाणार आहे. मजरेकाशीतील 40 घरे पूररेषेत असून तेथील 160 जणांना तेथील मारुती मंदिर, उर्दू शाळेत, तर नगर परिषद क्षेत्रात 6 हजार 652 घरे पूररेषेत असून त्यातील 2 हजार 500 नागरिकही पुरामुळे बाधित होणार आहेत. यातील 1 हजार जणांना पाग, ओझरवाडी, खेंड मराठी शाळा, युनायटेड हायस्कूल, डीबीजे महाविद्यालय, बांदल हायस्कूल, माटे, राधाताई लाड सभागृहात स्थलांतर केले जाणार आहे. मिरजोळी जुवाड बेटावरील 90 जणांना मिरजोळी प्राथमिक शाळेत, तर सती चिंचघरीतील 90 जणांना तेथील सती हायस्कूलमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.
दापोलीत तहसीलदारांच्या अधिकाऱयांना सूचना
मौजे दापोलीः संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील समुद्रालगत व अन्य धोकादायक ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीने तहसीलदारांनी महसूल विभागाला सूचना दिल्या आहेत. दापोली तालुक्यात दाभोळ-टेमकरवाडी, हर्णै-राजवाडी, पाजपंढरी, जुईकरमोहल्ला, आडेपार्ले आदी गावांतील धोकादायक ठिकाणी राहणाऱया ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्वतःहून नातेवाईक किंवा सुरक्षित ठिकाणी रहावे, तसेच कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याने लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर दापोली महसूल विभाग तसेच दापोली पोलीस ठाणे, सागरी पोलीस ठाणे, दाभोळ बंदर अधिकारी सज्ज आहेत. कोरोना रुग्णांना शहरातील अनेक ठिकाणी ठेवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे वीज जाण्याची शक्यता असल्याने जनरेटरची व्यवस्था तसेच आपत्ती उद्भवू नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
खेडात प्राथमिक शाळांमध्ये व्यवस्था करणार
खेडः अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील 18 गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावातील 4664 लोकांच्या राहण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली. शहरातील नदीकाठच्या रहिवाशांवर स्थलांतर करण्याची वेळ आलीच तर जिल्हा परिषदेच्या 4 शाळाही ताब्यात घेतल्या आहेत. बुधवारी बोट चालवण्याचे प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. याशिवाय नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.
मंडणगडात अद्याप स्थलांतर नाही
मंडणगडः अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यातील चिपोळे, उमरोली, वेसवी, बाणकोट-वेळास, पेवे, पडवे, उंबरशेत या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. मात्र कोणाचेही अद्याप स्थलांतर करण्यात आलेले नाही.
राजापुरात प्रशासनाची तयारीराजापूरः अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात संभाव्य धोका लक्षात घेवून राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी बैठक घेवून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत. आवश्यकता भासल्यास धोकादायक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.