कोरोनाच्या संसर्गातून बर्या होणार्या व्यक्ती आणि अन्य व्याधीग्रस्तांना सध्या ‘ब्लॅक फंगस इन्फेक्शन’ नावाचा संसर्ग जडताना दिसून आले आहे. हा संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागाला लक्ष्य बनवू शकतो.
- या बुरशीजन्य संसर्गाची लागण गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- या आजाराला ‘म्यूकोरमाइकोसिस’ म्हटले जाते आणि ही बुरशी शरीरात प्रवेश करून अवयवांना आतून कुरतडू लागते. संसर्ग अधिक झाल्यास अवयव कापावाही लागू शकतो.
- ही बुरशी सामान्यतः वातावरणात अस्तित्वात असतेच; परंतु ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशा व्यक्तींंना हा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
- मधुमेह असलेल्या व्यक्ती, एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण केलेल्या व्यक्ती तसेच इतर शारीरिक आजार असणार्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते आणि अशा व्यक्तींना हा संसर्ग सहजपणे जडू शकतो.
- ही बुरशी समान्यतः मातीत आढळून येते. त्याचप्रमाणे नाक, कान आदी अवयवांमधील मळातसुद्धा ती आढळते. ग्लूकोजचे उच्च प्रमाण, लोहाचे अधिक प्रमाण आणि आम्लयुक्त वातावरणात ही बुरशी लवकर वाढते आणि एंडोथेलियल पेशींच्या आक्रमणाला प्रोत्साहन देते.
- ही बुरशी श्वासाच्या माध्यमातून नाकाच्या पेशींपर्यंत पोहोचते आणि संसर्ग अधिक झाल्यास अशा स्थितीत सायनुसायटिस या नाकाच्या गंभीर आजाराला कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे डोळे आणि मेंदूच्या पेशींना प्रभावित करण्याबरोबरच ती हाडांपर्यंतही पोहोचू शकते.
- रुग्णांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असेल तर कोरोनाची औषधे दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी आणखी वाढते. शरीरातील अन्य संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दिल्या जाणार्या अँटिबायोटिक औषधांनी जीवाणू तर नष्ट होतात; परंतु फंगसच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. अशा स्थितीत हे फंगस म्हणजे बुरशी शरीराच्या अन्य भागांमध्ये आपला प्रभाव दाखवू लागते.
- या त्रासापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आणि त्यासाठी खाण्यापिण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी लावून घेणे आवश्यक असते. रोजच्या आहारात पोषक घटकांचा अंतर्भाव असायला हवा.
- अन्नात प्रथिनांचे प्रमाण संतुलित असायला हवे. जर प्रथिनांची कमतरता असेल तर ‘व्हिटॅमिन सप्लिमेन्ट’ घेऊन त्याची पूर्तता केली जाऊ शकते. याखेरीज रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य उपचारांद्वारे नियंत्रणात राखले पाहिजे.
- एखाद्याचे नाक बंद राहत असेल किंवा नाकात वेदना जाणवत असतील, नाकातून काळ्या रंगाचा मळ निघत असेल किंवा डोळ्यांच्या अवतीभोवती सतत वेदना होत असतील तर सावध व्हायला पाहिजे.
- याखेरीज डोळे आणि नाकाला सूज वाढल्याचे दिसून आल्यास आणि तिथे हात लावल्याने वेदना होत असल्यास, सातत्याने डोकेदुखीचा त्रास होत असल्यास आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.