ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. मात्र, तरी देखील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे.
राज्यात मागील 24 तासात 43 हजार 183 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 249 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात प्रथमच इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 28 लाख 56 हजार 163 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 54 हजार 898 एवढा आहे.
कालच्याा एका दिवसात 32,641 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 24 लाख 33 हजार 368 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 66 हजार 533 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.02 % तर मृत्युदर 1.02 % इतका आहे.
- मुंबई : 8,646 नवे रुग्ण; 55,005 ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. कालच्या दिवसात 8, 646 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल दिवसभरात 18 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 5,031 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 23 हजार 360 वर पोहचली आहे. तर 3,55,691 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,704 इतकी आहे. सद्य स्थितीत 55 हजार 005 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांचा आहे.