वृत्तसंस्था / कोलकाता
2011 आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाणेफेकीची प्रक्रिया गोंधळात टाकणारी ठरल्याने तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आणखी एकदा नाणेफेक हवी होती, असे प्रतिपादन लंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने केले.
भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ‘रिमीनेस्की विथ ऍश’ या मालिकेचे यजमानपद भूषविताना अलीकडच्या ताज्या एपीसोडमध्ये माजी कर्णधार संगकाराला 2011 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यातील वादग्रस्त ठरलेल्या नाणेफेक प्रकिये संदर्भात विचारणा केली.
या सामन्याला शौकिनांचा प्रतिसाद प्रचंड असल्याचे चित्र मला पहावयास मिळाले. यापूर्वी असेच वातावरण कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर होते. या अंतिम सामन्यात नाणेफेक झाली. मात्र, काय कौल मागितला होता, यावर एकमत झाले नाही. काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पुन्हा नाणेफेक झाली, त्यात कौल लंकेच्या बाजूने लागला.लंकेने नाणेफेक गमाविली असती तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली असती, असेही संगकाराने म्हटले आहे.
1996 साली लंकेने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली जिंकली होते. त्यानंतर 2011 साली लंकेला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्यात भारताकडून लंकेला पराभव पत्करावा लागला.
संगकारा म्हणाला की या अंतिम सामन्यात लंकेची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने आपण अधिक निराशा आणि दुखी झालो. लंकन संघाला 2007 साली तसेच टी-20 प्रकारात 2009 आणि 2012 साली जेतेपदाच्या संधी मिळाल्या होत्या. यजमान भारताने 2011 साली तब्बल 28वर्षानंतर आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुसऱयांदा जिंकली.
2011 साली झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी दुखापतीमुळे मॅथ्युजला सहभागी होता आले नाहे. त्यामुळे त्याची उणीव लंकन संघाला निश्चितच भासली. या अंतिम सामन्यात महेला जयवर्धनेचे नाबाद शतक (103) वाया गेले. भारतातर्फे सलामीचा गौतम गंभीरने 97 धावांची खेळी तसेच कर्णधार धोणीने विजयी षटकार खेचून नाबाद 91 धावांच्या खेळीने भारताने विश्व चषकावर दुसऱयांदा नाव कोरले, असे संगकाराने या सामन्याच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.