प्रतिनिधी / वाई
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे नुकतेच धरण स्थळी जाऊन धोम धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले, अशी माहिती धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांची यांनी दिली. धोम धरण शंभर टक्के भरले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे, असे ही त्यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष रणजित फाळके म्हणाले, एम डब्ल्यू आर आर ए चा निकाल संघर्ष समिती सारखा लागला असून 11.5 टीएमसी पाणी वाई, सातारा,कोरेगावच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. दरवर्षी पाणी पूजनाचा कार्यक्रम संघर्ष समिती फार मोठ्या प्रमाणावर शेतकरी धरणस्थळी बोलून करत असते. परंतु यंदा कोरोना रोगामुळे हा पाणी पूजनाचा कार्यक्रम फार थोड्या लोकांच्या मध्ये पार पाडत आहोत.
शेतकऱ्यांचे फोन संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांना येत होते की पाणी पूजनासाठी कधी जायचे परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी मागून हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने करत आहोत. अध्यक्ष बर्गे यांनी सांगितले की आपण सर्व शेतकरी एकमेकांच्या संपर्कात राहू जर पाणीवाटपात आपल्यावर अन्याय झालातर आपली पाण्याची लढाई सनदशीर कायदेशीर लढण्यास कायम सज्ज व्हा. यावेळी संघर्ष समितीच्या सदस्यांनी धोम धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती होतो याची पाहणी केली. तसेच बलकवडी धरणातून धोम धरणात किती पाणी सोडले जाते याची पाहणी केली.
तसेच खंडाळा व फलटण तालुक्यासाठी बोगद्यातून पाणी कसे सोडले जाते ते पाणी किती सोडण्यात येत आहे. याची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पावर काटेकोर लक्ष ठेवणार आहे. असे त्यांनी सांगितले. या पाणी पूजनासाठी धोम संघर्ष पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी.आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, हनुमंतराव जगदाळे, कॅप्टन महादेव भोसले, बापूराव फाळके हे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी धोम धरणाची परिक्रमा केली.