सततच्या खोदाईमुळे बसथांब्याच्या कामाला विलंब : स्मार्ट सिटीच्या कारभाराबद्दल नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
धर्मवीर संभाजी चौकात स्मार्ट बसथांबा उभारण्यात आला आहे. मात्र सदर बसथांब्यावर सातत्याने खोदाई सत्र सुरू आहे. याठिकाणी आता तिसऱयांदा रस्ता खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या बसथांब्याचे काम पूर्ण होण्यास आणखीन किती महिन्याचा कालावधी लागणार, अशी विचारणा होत असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र यापैकी धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्याचे काम मागील दीड वर्षापासून संपता संपेनासे झाले आहे. या ठिकाणी विविध कामे अर्धवट असल्याने सातत्याने खोदाई सत्र सुरू आहे. बसथांबा तयार केल्यानंतर लोकार्पण करण्यापूर्वीच दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या ठिकाणी साचणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यास जागा नव्हती. त्यामुळे बसथांब्यावरच सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत होती. याबाबत स्मार्टसिटी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. येथील बसथांब्यासमोर लहान गटार बांधून रस्त्यावरील पाणी गटारीद्वारे नाल्याला सोडण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत दिवे आणि अन्य काही दुरूस्तीची कामे प्रलंबीत होती. तसेच येथील स्वच्छतागृह देखील अद्याप बंदच आहेत. नळजोडणी करण्यात आली नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर होत नाही. ही कामे अर्धवट असताना आता पुन्हा रस्त्याशेजारी बसथांब्यावर खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी तिसऱयांदा खोदाई करण्यात येत असून हे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एका ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने खोदकाम करण्यात येत असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे अयोग्य नियोजन चव्हाटय़ावर आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर कामासाठी मंजूर झालेल्या निधीचा दुरुपयोग होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.