पायाला दुखापत – हल्ला करण्यात आल्याचा आरोप
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये प्रचारात झोकून दिलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला बुधवारी दुखापत झाली आहे. जाणूनबुजून माझा पाय चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला आहे. कटाच्या अंतर्गत माझ्यावर हल्ला करविण्यात आला आहे. हल्ल्यावेळी घटनास्थळी पोलीस नव्हते असे सांगत छातीत वेदना होत असल्याचे ममतांनी म्हटले आहे. तर भाजपने ममतांनी सहानुभूतीकरता हे नाटक चालविल्याची टीका केली आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
माझ्यावर 4-5 जणांनी हल्ला केला आहे. कारनजीक पोहोचताच काही जणांनी माझा पाय गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
ममतांच्या पायाला सूज
नंदिग्राममधील डॉक्टर ममतांच्या पायाला झालेल्या ईजेची तपासणी करत आहेत. डॉक्टरांकडून अहवाल मिळाल्यावर पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे. ममतांच्या पायांना सूज आली आहे. ममतांना ग्रीन कॉरिडॉर तयार करून कोलकाता येथे हलविण्यात आल्याचे समजते. कोलकात्यातील दोन रुग्णालयांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. ममतांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सहानुभूतीसाठी नाटक
दुसरीकडे भाजप नेते सुवेंदू अधिकारी आणि कैलास विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना खोटे ठरविले आहे. 6 वर्षांपासून बंगालच्या राजकारणात सक्रीय आहे. ममतांभोवती पोलिसांचा गराडा पाहता हल्ला होणे शक्य नाही. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला करण्याची स्थिती राज्यात नाही. पोलीस आणि गुन्हेगारांचे राज्यात संगनमत आहे. ममतांनी पराभवाच्या भीतीने केवळ सहानुभूतीची लाट मिळावी हे नाटक चालविले आहे. ममता काल चंडी पठण करत होत्या, आज नाटक करत असल्याचे म्हणत विजयवर्गीय यांनी टीका केली आहे. पोलीस आणि प्रशासन काय करत होते असा प्रश्नही भाजपने उपस्थित केला आहे.