वार्ताहर/ अथणी :
खानापूर तालुक्यातील शिवोली येथील शेतकऱयाने मिरची दर गडगडल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच अथणी तालुक्यातील शेतकऱयानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. संगाप्पा बसाप्पा यलट्टी (वय 50 रा. नंदेश्वर) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱयाचे नाव आहे. कर्जबाजारीपाणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात संगाप्पा यलट्टी यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यातून सावरत असतानाच पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. दरम्यान त्यांनी शेतीसाठी विविध बँका आणि खासगीतून 5 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र महापूर आणि लॉकडाऊनच्या फटक्याने सदर कर्ज कसे फेडावयाचे याची चिंता त्यांना लागली होती. सदर कर्जाच्या नैराश्येतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपविले. या घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महापूर, लॉकडाऊनचा बळीराजाला फटका
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी व महापुरामध्ये शेतीपिके पाण्याखाली जाताना लाखो रुपयांचा फटका बसला होता. यातून सावरत असतानाच कोरोना विषाणूचे संकटही आवासून उभे ठाकले आहे. पिकविलेल्या मालाला लॉकडाऊनमुळे बाजारपेठच उपलब्ध नसल्याने उत्पादित माल बांधावर काढून टाकण्याची वेळ आल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण जिल्हय़ात वाढत आहे. याची दखल घेत प्रशासनाने शेतकऱयांचे प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.