प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी सातारा शहराच्या लगत असलेल्या शाहूपुरीसह तामजाईनगर भागात सकाळी 10 वाजल्यापासून लाईट नव्हती. लाईट गेल्यानंतर अनेकांचे फोन महावितरणच्या कार्यलयात खणाणले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांनी लगेच शोध सुरू केला. 2 वाजता एमआयडीसीमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. उन्हातान्हात राबून दुरुस्ती करणाऱया महावितरणच्या कर्मचाऱयांनी दुरुस्ती केल्याबद्दल कौतुक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात लॉकडाऊन आहे. याच लॉकडाऊनमध्ये सोमवारी अचानक महावितरणचे लाईटमध्ये बिघाड झाला. शाहूपुरी, मोळाचा ओढा, तामजाईनगर या भागात सोमवारी सकाळी 10 पासून ही लाईट गेल्याने अनेक नागरिकांनी फोनवरून महावितरण कार्यलयात माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला. सुरुवातीला कार्यलयात माहिती दिली जात होती, परंतु पुन्हा फोन उचलणे बंद झाले. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला खरा पण महावितरणचे कर्मचारी, अधिकारी बिघाड कुठे झाला आहे याची शोधण्यासाठी बाहेर पडले. एमआयडीसी साताराहून येणाऱया 33 केव्ही उच्च दाब वाहिनीमधून वीज पुरवठा करणाऱया विद्युत वाहिनीमध्ये बिघाड असावा, अशी साधारण शंका आल्याने महावितरणचे कर्मचारी भर उन्हात बिघाड दुपारी दोन वाजेपर्यंत शोधत होते. अनेक ठिकाणचे संभाव्य बिघाड दुरुस्त करुनही तांत्रिक दृष्टय़ा प्रत्येक फेजवर समतोल वीजदाब येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर कर्मचाऱयांनी अनेक रोहित्रांची तपासणी केल्यावर एका रोहित्रावरील करंट 400ऍम्पियर ट्रान्सफॉर्मर बिघडल्याचे निदर्शनास आले. योगायोगाने करंट ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्याने तो सर्व प्रकारच्या विद्यूत तांत्रिक खबरदारी घेऊन महावितरणच्या तपासणी पथकाच्या तीस एक कर्मचाऱयांनी सायंकाळी पावणे सात वाजता विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.
विद्युत अभियांत्रिकी विषयातील रोहित्रातील अतिशय गंभीर दुरुस्ती निर्माण झाली होती. महावितरणच्या कर्मचाऱयांनी नऊ तास हालचाली करून विद्युत पुरवठा पुर्ववत केला. महावितरणचे 30 कर्मचाऱयांसोबत अभियंता जितेंद्र माने सुध्दा उपस्थित होते.