अमलीपदार्थ विरोधी विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाने गेल्या नऊ महिन्यांत म्हणजे 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 75 लाख 71 हजार 300 रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणांत एकूण 23 संशयितांना अटक केली आहे.
एकूण 18 तक्रारी नोंद केल्या असून त्यात 23 संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये 19 भारतीय तर 4 विदेशी संशयितांचा समावेश आहे. एकूण 39 किलो 259 ग्रॅम विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त केला आहे. त्यात एमडीएम 177.77 ग्रॅम, गांजा 36 किलो 870 ग्रॅम, एलएसडी द्रव 64.91 ग्रॅम, हेरॉईन 308.06 ग्रॅम, हशिष तेल 1 किलो 760 ग्रॅम, ऍस्टासी पावडर 58.40 ग्रॅम, एम्फाटामाईन 20 ग्रॅम यांचा समावेश आहे.
राज्यातील पर्यटक हंगाम केवळ चार दिवसांपूर्वीच सुरू झाला असला तरी 2021 सालच्या तुलनेत 2022 सालातील अवघ्या नऊ महिन्यांत मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात ड्रग्ज प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 2021 च्या संपूर्ण वर्षात एएनसीने केलेल्या कारवाईत 1 कोटी 23 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा 29 किलो 340 ग्रॅम विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त केला होता. 24 तक्रारींची नोंद करून 25 संशयितांवर अटकेचा कारवाई केली होती. त्यात 16 भारतीय तर 9 विदेशी संशयितांचा समावेश आहे. एकंदरीत एएनसीकडून मिळालेल्या आकडेवारी पाहिल्यास 2021 च्या तुलनेत 2022 या वर्षात अधिक ड्रग्ज जप्त केला आहे. अद्याप पर्यटन हंगामाचे महत्त्वाचे तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे राज्यात ड्रग्स प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गोवा ड्रग्ज वितरणाचे मुख्य केंद्र बनतेय?
गोवा हे भारतातील प्रमुख केंद्र असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. विदेशातून येणारा ड्रग्ज मुंबईमार्गे अगोदर गोव्यात येतो आणि नंतर गोव्यातून त्याचे इतर राज्यात वितरण होत असते. काही दिवसांपूर्वी मुंबईत एनसीबीने जप्त केलेला 13 कोटी रुपये किमतीचे ब्लॅक कोकीन ब्राझीलहून मुंबईमार्गे गोव्यात येण्याच्या तयारीत होते. नंतर गोव्यातून भारतातील इतर राज्यात वितरण करणारी नायजेरियन महिला गोव्यात येऊन राहिली होती. त्यामुळे गोवा हे विदेशातून येणाऱया ड्रग्जचे मुख्य केंद्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकशी करण्याचा केवळ फार्स
राज्यतील एएनसी पोलीस तसेच अन्य पोलीसही ड्रग्ज विरोधात कारवाई करीत आहेत, मात्र या प्रकरणात बडय़ा हस्तीचे हात असल्याने अनेकवेळा पोलिसांवरीही दबाव येत असतो. इतकेच नव्हे तर काही पोलीसही ड्रग्ज प्रकरणात अडकलेले असल्याने मोठमोठय़ा पाटर्य़ांमधून खूले आम ड्रग्जची विक्री होत असते. ओव्हर डोसमुळे एखाद्या नामांकित व्यक्तीचा मृत्यू झाला की सारा प्रकार उघडकीस येतो. अशा प्रकरणाची काही दिवस चौकशी करण्याचा फार्स सुरू होतो, नंतर सर्व काही सुरळीत सुरू असते. तोपर्यंत सर्वसामान्य लोकही सर्व काही विसरून गेलेले असतात. त्यामुळे गोव्यातील ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठोस कारवाई करणे काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे.