कोरोना काळातील सहा महिन्यांतील चित्र, मोफत भोजनाने सर्वसामान्यांना दिलासा
प्रवीण देसाई/कोल्हापूर
कोरोना काळात जिह्यातील 9 लाख 24 हजार 201 जणांच्या पोटाला मोफत शिवभोजन थाळीने आधार दिला आहे. 15 एप्रिल ते 27 सप्टेंबर या सहा महिन्यांतील हे चित्र आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिह्यातील 41 केंद्रांमधून त्याचे वितरण केले. या योजनेने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने 15 एप्रिलपासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला. या काळात कष्टकरी, कामगारांसह सर्वसामान्य घटकांचे रोजगार बंद झाले. सर्वसामान्यांच्या पोटाचे हाल होऊ नयेत, त्यांच्या पोटात अन्नाचे चार घास पडावेत, यासाठी सरकारने मोफत शिवभोजन थाळीच्या वितरणाचे आदेश दिले. त्यानुसार जिह्यात जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून कार्यवाही सुरु झाली. जिह्यातील 41 शिवभोजन केंद्रांवरुन रोज सरासरी 5 हजार थाळ्यांचे वितरण सुरु राहिले. जिल्हा पुरवठा विभागाने योग्य पद्धतीने नियोजनाद्वारे ही योजना अविरत सुरु ठेवली. त्यामुळे सर्वसामान्य घटक जेवणापासून वंचित राहिला नाही. गेल्या सहा महिन्यांत जिह्यातील 9 लाख 24 हजार 201 जणांच्या पोटात मोफत शिवभोजनाचा घास मिळाला. अशा संकटकाळात पोटभरुन मिळालेल्या भोजनाने नक्कीच सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले.
कोरोना काळात शासनाने सर्वसामान्यांसाठी 15 एप्रिलपासून मोफत शिवभोजन थाळी सुरु केली. गेल्या सहा महिन्यांत त्याचे जिह्यातील शिवभोजन केंद्रांवर नागरिकांना वितरण झाले. -दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिह्यातील शिवभोजन केंद्रांची संख्या
तालुका/शहर केंद्रे
कोल्हापूर शहर 14
इचलकरंजी शहर 4
करवीर 1
कागल 2
हातकणंगले 1
शाहूवाडी 3
राधानगरी 2
भुदरगड 1
शिरोळ 2
गडहिंग्लज 3
पन्हाळा 3
आजरा 1
चंदगड 2
गगनबावडा 2