ऑनलाईन टीम / बीजापूर :
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनहासला सोडले आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले. राकेश्वर सिंह हे बेपत्ता झाले होते. तर 7 एप्रिल रोजी राकेश्वर सिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो नक्षलवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा देखील केला होता. त्यानंतर कोब्रा जवान राकेश्वर मनहार 6 दिवसांनंतंर नक्षलवाद्याच्या तावडीतून सुटले आहे.
- राकेश्वर सिंह यांच्या परिवारात आनंदी वातावरण!
राकेश्वर सिंह यांच्या आई कुंती देवी यांनी मुलाच्या सुटकेनंतर सांगितले की, आम्ही खूप खुश आहोत. ज्यांनी माझ्या मुलाला सोडवून आणले त्यांचे ही धन्यवाद. त्यासोबतच देवाचेही खूप खूप धन्यवाद, अशा भावना व्यक्त केल्या.
तर राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या सुटकेनंतर छत्तीसगड सरकारचे आभार मानले आहेत. आज माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे म्हटले आहे.