वनक्षेत्रात राहणाऱया आणि नागरी सुविधांपासून पूर्णतः वंचित असणाऱया तसेच गरिबीच्या खाईत पडलेल्या वनवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्षलवादाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. सामोपचाराने हा न्याय मिळत नसल्याने हाती शस्त्र घेण्यापासून पर्याय नसल्याचेही नक्षलवादाचे समर्थक म्हणतात. तथापि झारखंडमधल्या अनेक जिल्हय़ांमध्ये आज नक्षलवाद हा वनवासीना न्याय मिळवून देण्याचे आपले उदात्त कर्तव्य पूर्णतः विसरला असून नक्षलवादाच्या माध्यमातून नागरिकांकडून खंडणी गोळा करणे आणि त्या पैशावर चैन करणे असे उद्योग नक्षलवाद्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ज्या वनवासींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद प्रस्तापित झाला तोच नक्षलवाद आता त्याच लोकांची लूट करीत आहे, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. नक्षलवादी खंडणीतून मिळणारी रक्कम प्रत्येक जिल्हय़ामध्ये कित्येक कोटींच्या घरात जाते, असेही आढळले आहे.
झारखंड सरकार आणि केंद सरकार संयुक्तरित्या केलेल्या कारवायांमध्ये अनेक कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांकडून कोटय़वधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. विनोदकुमार गंझू, मुनेश गंझू, बिरबल गंझू, गोपालसिंह भोक्ता इत्यादींना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत 100 कोटी रुपयाहून अधिक संपत्ती नक्षलवाद्यांकडून जप्त केल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. काही नक्षलवाद्यांकडे अलिशान घरे आणि आधुनिक वाहने असल्याचेही दिसून आले आहे. यामुळे स्थानिक जनतेचा नक्षलवादी नेत्यांवरचा विश्वास उडाला असून ही जनता शासनाला सहकार्य करीत असल्याचे दिसून येते.